शेतकऱ्यांच्या देशव्यापी ‘भारत बंद’चे देशभरातून समर्थन


नवी दिल्ली – शेतकऱ्यांनी केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषि विधेयकाविरोधात एल्गार पुकारला आहे. नव्याने लागू करण्यात आलेले कृषि विधेयक मागे घेण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. केंद्र सरकार आणि शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी यांच्यात याच पार्श्वभूमीवर अनेक बैठकी झाल्या, पण त्या निष्फळ ठरल्या. शेतकऱ्यांनी याच पार्श्वभूमीवर आज ‘भारत बंद’ची हाक दिली आहे. अनेक शेतकरी संघटनांनी शेतकऱ्यांच्या या भारत बंदला विरोध केला आहे.

शेतकऱ्यांच्या वतीने सांगण्यात आले आहे की, कोणालाही भारत बंदमध्ये सहभागी होण्यासाठी बंदी नाही. सर्वांना सांकेतिक बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहनही यावेळी शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींनी केले. शेतकरी नेत्यांचे म्हणणे आहे की, आंदोलनातंर्गत सकाळी 11 वाजल्यापासून ते दुपारी 3 वाजेपर्यंत ते ‘चक्का जाम’ आंदोलन करतील. ज्यादरम्यान, प्रमुख रस्त्यांवर आंदोलन करण्यात येणार आहे. उत्तरेकडील राज्यांमध्ये आंदोलनातंर्गत खासकरुन पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि दिल्लीतील शेतकरी रस्त्यावर उतरणार आहेत.

कृषि विधेयके रद्द करण्याच्या मागणीसाठी दिल्लीच्या वेशीवर शेतकऱ्यांनी वेढा दिला आहे. अशातच केंद्र सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये सलग चर्चा सुरु आहे. तसेच यावर तोडगा काढण्यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरु आहेत. पाचवी बैठक निष्फळ ठरल्यानंतर आता शेतकरी संघटना आणि केंद्र सरकारमध्ये सहावी बैठक उद्या म्हणजेच, 9 डिसेंबरला होणार आहे. असे सांगितले जात आहे की, यावेळी शेतकरी आपल्या मागण्यांवर ठाम राहणार असल्यामुळे शेतकऱ्यांच्या मागण्यांपुढे केंद्र सरकार नमते घेणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

शेतकरी आंदोलनाला जवळपास सर्वच विरोधी पक्षांनी पाठिंबा दर्शवला असून ‘भारत बंद’ला देखील समर्थन दर्शवले आहे. तसेच, केंद्र सरकारकडून देशव्यापी बंदच्या पार्श्वभूमीवर राज्य व केंद्रशासित प्रदेशांना नियमावली पाठवण्यात आली आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने नियमावली पाठवताना राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांना भारत बंद दरम्यान कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये आणि कायदा आणि शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी सांगितले आहे. याव्यतिरिक्त, राज्य सरकारे आणि केंद्रशासित प्रदेश प्रशासकांनी कोविड -19 च्या मार्गदर्शक तत्त्वांचे

सरकार आणि सुरक्षा यंत्रणा भारत बंदच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेसंदर्भात सतर्क आहेत. गेल्या 10 दिवसांपासून दिल्लीच्या सीमांवर शेतकऱ्यांनी वेढा दिला असून मागण्या मान्य करण्यासाठी आंदोलन सुरु आहे. दिल्लीमध्ये पोलिसांनी सुरक्षेसाठी कडक बंदोबस्त केला आहे. भारत बंदच्या पार्श्वभूमीवर बंद पाळण्यासाठी जबरदस्ती करणाऱ्या लोकांवर कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे.