शेतकरी आंदोलनाच्या १२ दिवसांमध्ये आठ आंदोलक शेतकऱ्यांचा मृत्यू


नवी दिल्ली – कृषि विधेयकांना विरोध करण्यासाठी शेतकऱ्यांनी पुकारलेल्या आंदोलनातील आणखीन एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला असून सोमवारी अचानक टिकरी सीमेजवळ आंदोलनात सहभागी झालेल्या शेतकऱ्याची प्रकृती खालावल्यानंतर बहादूरगढमधील एका रुग्णालयात या शेतकऱ्याला दाखल करण्यात आले. पण शेतकऱ्याचा उपचारादरम्यान या रुग्णालयामध्ये मृत्यू झाला. याबाबत डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार हृदयविकाराचा झटका या शेतकऱ्याला आला होता. या शेतकऱ्याने सुरुवातीला काही काळ उपचारांना प्रतिसाद दिला, पण आज सकाळी या व्यक्तीचे उपचारादरम्यान निधन झाले. मिळालेल्या माहितीनुसार आंदोलनाच्या पहिल्या दिवसापासून हा शेतकरी टिकरी सीमेजवळ सुरु असणाऱ्या आंदोलनात सहभागी होता.

शेतकरी आंदोलनामध्ये सहभागी असलेल्या गज्जर सिंह नावाच्या शेतकऱ्याचाही यापूर्वी मृत्यू झाला होता. हृदयविकाराच्या झटक्याने गज्जर सिंह यांचा मृत्युही झाला होता. त्यांचा मृत्यू बहादुरपगड बायपासजवळ न्यू बस स्टॅण्डजवळच झाला होता. लुधियानामधील समराला येथील खटरा भगवानपूर गावचा गज्जर सिंह रहिवाशी होता. तो ५० वर्षांचा होता. तो शेतकरी आंदोलनात सहभागी होण्यासाठी आले होता. आंदोलनाच्या या १२ दिवसांमध्ये वेगवेगळ्या घटनांमध्ये आठ शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याचे वृत्त न्यूज १८ ने दिले आहे.

दिल्लीच्या दिशेने निघालेल्या पंजाबमधील शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टरमध्ये बिघाड झाल्यानंतर तो दुरुस्त करण्यासाठी आलेल्या मेकॅनिकच्या गाडीला आग लागल्याने या मेकॅनिकचाही मृत्यू झाला. शनिवारी रात्री ही घटना घडली. मेकॅनिकचा चारचाकी गाडीला आग लागल्याने होरपळून मृत्यू झाला. या घटनेचा पोलिसांनी पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला होता. जनकराज धनवाला मंडी येथील राहणारा असणारा हा तरुण आपले शेतकरी मित्र हरप्रीत, गुरप्रीत आणि गुरजंट सिंह यांच्यासोबत शनिवारी रात्री साडेअकराच्या सुमारास बहादुरगड येथे आला होता. आंदोलनातील शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर दुरुस्त करण्यासाठी तो आला होता. रात्री सर्वजण आपआपल्या जागी झोपण्यासाठी गेले होते. रात्री दीडच्या सुमारास शॉर्ट सर्कीटमुळे अचानक गाडीने पेट घेतला. त्यातच त्याचा मृत्यू झाल्याचे पोलीस अधीक्षक राजेश दुग्गल यांनी सांगितले.