दिल्ली पोलिसांनी 5 आयएसआयशी संबंधित दहशतवाद्यांना केली अटक


नवी दिल्ली : दिल्ली पोलिसांनी दिल्ली-एनसीआरमध्ये सुरू असलेल्या शेतकर्‍यांच्या आंदोलनादरम्यान 5 दहशतवाद्यांना अटक केली आहे. रविवारी रात्री पोलिसांसोबत झालेल्या चकमकीनंतर पूर्व दिल्लीतील शकरपूर भागातून या दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री या पाच दहशतवाद्यांना पळ काढण्याचा प्रयत्न करीत असताना दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने अटक केली. यावेळी त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि इतर स्फोटक वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. या पाच दहशतवाद्यांची दिल्ली पोलीस कसून चौकशी करत आहेत.

दिल्ली पोलिसांच्या माहितीनुसार, या पाच दहशतवाद्यांचे संबंध पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणा आयएसआय सोबत असल्याचे चौकशीदरम्यान समोर आले आहे. ते दहशतवादी आयएसआयच्या सांगण्यावरून घटना घडवून आणण्याचा प्रयत्न करीत होते. शेतकरी आंदोलनाच्या वेळी त्यांची उपस्थिती देखील अनेक प्रश्न उपस्थित करीत आहे? राष्ट्रीय राजधानी दिल्लीत मोठा दहशतवादी हल्ला करण्याच्या प्रयत्नात हे पाच दहशतवादी होते. त्याचबरोबर चौकशी दरम्यान असे निष्पन्न झाले आहे की, या पाच पैकी जण ३ काश्मीर आणि २ जण पंजाबशी संबंधित आहेत.

पाच दहशतवाद्यांना पूर्व दिल्लीतील शकरपूर भागात चकमकीनंतर अटक करण्यात आली आहे. पाकिस्तानच्या इंटर-सर्व्हिसेस इंटेलिजेंसकडून या पाच दहशतवाद्यांचा वापर केला जात असल्याचे प्राथमिक चौकशीत उघड झाले आहे. हे दहशतवादी दिल्लीत कोणता कट रचत होते याबाबत पोलिसांकडून चौकशी सुरु आहे.