लसीचा डोस घेतल्यानंतरही कोरोना का झाला?; भारत बायोटेकने सांगितले कारण


नवी दिल्ली – हरयाणाचे आरोग्य मंत्री अनिल विज यांना हैदराबादस्थित भारत बायोटेकने विकसित केलेली ‘कोवॅक्सिन’ ही लस चाचणीदरम्यान घेतल्यानंतर कोरोनाची लागण झाल्याचे समोर आल्यामुळे या लसीबाबत उलटसुलट चर्चा सुरु झाली असताना भारत बायोटेकने याबाबत स्पष्टीकरण दिले आहे.

भारत बायोटेकने यासंदर्भात जारी केलेल्या निवेदनात म्हटले, दोन डोसवर आधारित आमची क्लिनिकल ट्रायल ही आहे. २८ दिवस त्यासाठी द्यावे लागतात. म्हणजेच दुसरा डोस घेतल्यानंतर १४ दिवसांनंतर कोवॅक्सिन लसीची कार्यक्षमता ही निश्चित केली जाऊ शकते. क्लिनिकल ट्रायलदरम्यान दोन आठवड्यांपूर्वी हरयाणाचे मंत्री अनिल विज यांनी कोवॅक्सिन लसीचा एक डोस घेतला होता. त्यानंतर ते कोरोनाबाधित आढळून आले. यानंतर भारत बायोटेकने याबाबत स्पष्टीकरण दिले आहे.

कंपनीने निवेदनात पुढे म्हटलं की, ही लस चाचणीचा भाग म्हणून ५० टक्के सहभागींना मिळाली तर इतरांना प्लेसबो देण्यात आला होता. फेज-३ मधील ट्रायल ही दुप्पट करण्यात आली होती. यामध्ये ५० टक्के सहभागींना लस देण्यात आली तर उर्वरितांना प्लेसबो देण्यात आला.

भारत बायोटेकच्या मानवी चाचणीत अनिल विज यांनी स्वेच्छेने भाग घेतला होता. २५,००० पेक्षा अधिक लोकांना यामध्ये चाचणी डोसेस देण्यात आले होते. विज यांना हा डोस २० नोव्हेंबर रोजी देण्यात आला होता. हरयाणातील कोरोनाच्या लसीचा डोस घेणारे ते पहिले व्यक्ती ठरले होते. त्याचबरोबर कोवॅक्सिनचा डोस हरयाणातील ४०० लोकांनाही देण्यात आला यामध्ये रोहतकचे पीजीआयएमएस विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. ओ पी कार्ला यांचाही समावेश आहे.

अंबाला कॅन्टोन्मेट सिविल हॉस्पिटलमध्ये विज यांना रोहतकच्या पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्सेसच्या टीमने लस दिली होती. त्यानंतर त्यांची प्रकृती आणि शरीरातील प्रमुख अवयवांचे निरीक्षण दर आठवड्यांनी केले जात होते.

ही कोरोना प्रतिबंधक लस भारत बायोटेकने पुण्यातील राष्ट्रीय विषाणू संस्थान (एनआयव्ही) आणि दिल्लीतील इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (आयसीएमआर) एकत्रितपणे विकसित केली आहे. या कंपनीने आजवर विविध आजारांवर अनेक लस विकसित केल्या आहेत.