१ मे २०२२ पर्यंत सुरु होईल समृद्धी महामार्ग – उद्धव ठाकरे


औरंगाबाद : युद्धपातळीवर समृद्धी महामार्गाचे काम सुरु असून मुंबईपर्यंत समृद्धी महामार्ग १ मे २०२२ पर्यंत सुरु होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. अमरावतीमध्ये बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या कामाची त्यांनी पाहणी केल्यानंतर ही घोषणा केली.

काम चांगल्या पद्धतीने या महामार्गाचे सुरु असून काम चांगल्या दर्जाचे होत असल्याची पावती यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली. नागपूर ते शिर्डी समृद्धी महामार्गावरील प्रवास येत्या १ मे २०२१ पर्यंत सुरु होणार आहे. तर मुंबईपर्यंत महामार्ग १ मे २०२२ पर्यंत सुरु होणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिल्यानंतर उद्धव ठाकरे हेलिकॉप्टरने औरंगाबादच्या दिशेने रवाना झाले.

मुख्यतः १२ जिल्ह्यातून समृद्धी महामार्ग जातो. महाविकास आघाडीचे सरकार राज्यात आल्यानंतर या महामार्गाचे नाव स्वर्गीय हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग असे करण्यात आले. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्यानंतर पहिल्यांदाच समृद्धी महामार्गाच्या कामाची पाहणी केली. येत्या एप्रिलपासून समृद्धी महामार्गचा काही टप्पा सुरू होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे त्याची चाचपणी करत आहेत. त्यानिमित्ताने त्यांनी ही पाहणी घेत कामाचा आढावा घेतला.