उद्यापासून 16 डिसेंबरपर्यंत आळंदीत संचारबंदी


पुणे – आषाढी, कार्तिकी वारीनंतर आता दरवर्षी तीर्थक्षेत्र आंळदी येथे होणाऱ्या संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळ्यावर कोरोनाचे सावट निर्माण झाले असून आळंदीत उद्यापासून अर्थात 6 डिसेंबर ते 16 डिसेंबर या कालावधीत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी लागू करण्यात आल्याची माहिती पिंपरीचे पोलीस उपायुक्त मंच्चाक इप्पर यांनी दिली आहे.

येत्या 8 ते 14 डिसेंबरपर्यत आंळदी येथे संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त व कार्तिकी यात्रा होणार आहे. पण यंदा कोरोनाचे संकट निर्माण झाले असून आंळदी शहरासह आजुबाजुच्या गावांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पोलिस प्रशासनाकडून संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

आळंदीत उद्यापासून कलम 141 लागू करण्यात येणार असल्यामुळे बाहेरुन आलेल्या कोणत्याही व्यक्तीला आळंदी शहरात प्रवेश करता येणार नाही. या पार्श्वभूमीवर यंदाचा संजीवन समाधी सोहळा कसा पार पडणार आहे, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

पोलीस उपायुक्तांनी सांगितल की, जिल्हा अधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी पुण्यात आळंदीतील कार्तिकी वारी संदर्भात एक बैठक घेतली. कोरोना संसर्गचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पोलिस प्रशासनाकडून 6 डिसेंबर ते 14 डिसेंबरपर्यंत आळंदीसह आजुबाजुच्या परिसरात संचारबंदी लागू करण्याचा निर्णय त्या बैठकीमध्ये घेण्यात आला. दरम्यान, ही शिफारस पोलिसांनी पंढरपूरच्या धर्तीवर केली होती.

पोलिसांचा मोठ्या प्रमाणात बंदोबस्त आळंदीसह मंदिर परिसरात तैनात करण्यात येणार आहे. आळंदीकडे येणारे सर्व रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहेत. औद्योगिक वसाहतीतील वाहतूक देखील बंद करण्यात येणार आहे. उद्योग नगरीतील वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग म्हणून बायपासचा वापर करावा, अशी सूचना वाहतूक विभागाकडून देण्यात आली आहे.

वारकऱ्यांचा आळंदीत कार्तिकी यात्रा आणि संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळ्याच्या काळात मुक्काम असतो. ही परंपरा कायम ठेवत कार्तिकी वारीसाठी पंढरपूरातून आळंदीत येणाऱ्या श्री. पांडुरंग, संत नामदेव, संत पुंडलिक या तीन दिंड्यांना राज्य शासनाने परवानगी दिली आहे. तीनही दिंड्यांसोबत प्रत्येकी वीस लोकांना आळंदीत येण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. स्वतंत्र एसटी बसची व्यवस्था तीन दिंड्यांसाठी करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.