भाजपचाच भगवा मुंबई महानगरपालिकेवरही फडकणार; राम कदम यांचा विश्वास


मुंबई – हैदराबादमधील महानगरपालिकेची निवडणूक सर्वच पक्षांसाठी प्रतिष्ठेचा विषय बनली होती. नुकतेच हैदराबाद महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या १५० जागांचे निकाल जाहीर करण्यात आले. यामध्ये टीआरएस पहिल्या क्रमांकावर, दुसऱ्या क्रमांकावर भाजप तर तिसऱ्या क्रमांकावर असदुद्दीन ओवेसी यांचा एमआयएम पक्ष आहे. हैदराबादमधील या निकालांनंतर महापालिकेत त्रिशंकू परिस्थितीत निर्माण झाली असली तरी या निवडणुकीत भाजपने जोरदार मुसंडी मारली आहे. दरम्यान, भाजप नेते राम कदम यांनी निकालानंतर भाजपचा झेंडा मुंबई महानगरपालिकेवरदेखील फडकवणार असल्याचा विश्वास व्यक्त केला.

भाजपने बिहारमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली विजय मिळवल्यानंतर हैदराबादमध्ये ज्या प्रकारचे यश भाजपला मिळाले, त्यावरुन पंतप्रधानांच्या नेतृत्वावर देशातील जनतेला किती विश्वास आहे हे दिसून येते. विकासाला लोकांनी स्वीकारले असून आम्हाला पूर्ण विश्वास आहे की भाजपचाच भगवा मुंबई महानगरपालिकेवरदेखील फडकणार, असल्याचे राम कदम म्हणाले.

जनता शिवसेनेच्या ३० वर्षांच्या भ्रष्टाचाराला कंटाळली असून जो निष्काळजीपणा कोरोना काळातही करण्यात आला, तो लोकांच्या लक्षात आहे. मुंबई पालिकेवर भाजपचाच भगवा फडकणार, असा आम्हाला विश्वास असल्याचेही त्यांनी नमूद केले. त्याचबरोबर काँग्रेससोबत अनेक वर्ष देशातील ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी काम केले आहे. त्यांना मोठा अनुभव आहे. त्यांनी अनुभवाच्या जोरावर राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. असे असलेतरी ते त्यांच्यासोबतच राज्यात सरकार चालवत आहेत हा विरोधाभास असल्याचेही कदम म्हणाले. राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर बराक ओबामा यांनीदेखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. केव्हा पर्यंत एका कुटुंबाच्याच मागे काँग्रेसचे नेते धावत राहणार?, असा सवालही त्यांनी यावेळी केला.