आम्हाला कुणी बिन कामाचा सल्ला देण्याची काही गरज नाही; अजित पवारांनी चंद्रकात पाटलांना सुनावले


पुणे : राज्यात नुकत्याच पार पडलेल्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीत महाविकास आघाडीने भाजपला अनेक ठिकाणी चितपट केल्यानंतर महाविकास आघाडीतील नेते व भाजप यांच्यात चांगलीच जुंपली आहे. त्यातच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीतील तीनही पक्षांनी एक एकट्याने आमच्याशी लढावे, असे खुले आव्हान दिले होते. त्याला राष्ट्रवादीचे नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आता जोरदार प्रत्युत्तर देताना चंद्रकांत पाटलांनाच खडे बोल सुनावले आहे.

महाविकास आघाडीने राज्यातील विधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुक निकालांमध्ये जोरदार मुसंडी मारत भाजपला जोरदार धक्का देत घवघवीत यश मिळवले आहे. भाजपला पुणे, नागपूर या बालेकिल्ल्यांसह औरंगाबादमध्येही दारुण पराभवाचा सामना करावा लागला. आता महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून या धक्कादायक निकालानंतर भाजपला लक्ष्य केले जात असतानाच पत्रकारांशी बोलताना अजित पवारांनी भाजपवर टीका केली आहे.

अजित पवार म्हणाले, आघाडी करून लढायचे की आम्ही एक एकट्याने या संबंधीचा निर्णय आघाडीतील सहभागी पक्षांचे वरिष्ठ नेते घेतील. बिन कामाचा सल्ला आम्हाला कुणी देण्याची काहीही गरज नाही. या निवडणुकीच्या निकालातून एकत्रितपणे लढण्याचे परिणाम समोर आले आहे. सर्वच मतदारसंघात आघाडीतील पक्षांच्या नेते व कार्यकर्त्यांनी एकत्रित पणे काम केल्यामुळे पुढील काळात अधिकाधिक आघाडीचा आमचा प्रयत्न असणार आहे. आमच्या वेगळे लढण्याने जर विरोधकांचा फायदा होणार असेल तर तसे अजिबात होता कामा नये.

पराभव आम्ही स्वीकारतो आणि त्याचे आत्मचिंतन करतो, अशी भूमिका चंद्रकांत दादांनी करणे अपेक्षित होते. पण ते याऊलट दावे करत आहेत. जर त्यांच्या जागी माझ्यासारखा माणूस असता तर खुल्या मनाने पराभव मान्य केला असता. तसेच आत्मपरिक्षण करण्याची आम्हाला गरज आहे. एवढा दारुण पराभव आमचा का झाला याचे चिंतन करुन वगैरे वगैरे. पण त्यांच्या लोकांची तो देखील दिलदारपणा दाखवण्याची दानत नाही. परंतु, ठीक आहे, त्यांचे त्यांना लखलाभ, अशा शब्दात अजित पवार यांनी भाजपवर हल्लाबोल केला.