पहिला टी-२० सामना टीम इंडियाने ११ धावांनी जिंकला


कॅनबेरा – टीम इंडियाने पहिल्या टी-२० सामन्यात युजवेंद्र चहल, टी. नटराजन आणि इतर भारतीय गोलंदाजांनी केलेल्या भेदक माऱ्याच्या जोरावर ११ धावांनी विजय मिळवला आहे. १६२ धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या ऑस्ट्रेलियन संघाने आश्वासक सुरुवात केल्यानंतर मधल्या षटकांमध्ये हाराकिरी केली. ऑस्ट्रेलियन फलंदाज रविंद्र जाडेजाऐवजी बदली खेळाडू म्हणून आलेल्या चहलच्या फिरकीच्या जाळ्यात अकडले. भारताने या विजयासह ३ सामन्यांच्या मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे.

१६२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या ऑस्ट्रेलियाच्या सलामीवीरांनी चांगली सुरुवात केली. भारतीय गोलंदाजांची पॉवरप्लेच्या षटकांमध्ये कर्णधार फिंच आणि डार्सी शॉर्ट यांनी धुलाई करत अर्धशतकी भागीदारी केली. टीम इंडियाला रविंद्र जाडेजाचे मैदानावर नसणे चांगलेच महागात पडत होते. त्यात भारतीय खेळाडूंनी काही सोपे झेल टाकत आणि धावा बहाल करत कांगारुना मदतच केली. चहलने अखेरीस कर्णधार फिंचला माघारी धाडत ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का दिला, ३५ धावा काढून तो माघारी परतल्यानंतर चहलनेच स्टिव्ह स्मिथला स्वस्तात माघारी धाडले.

यानंतर टी. नटराजनने फॉर्मात असलेल्या ग्लेन मॅक्सवेलला माघारी धाडत कांगारुंच्या अडचणींमध्ये भर टाकली. नटराजनची आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमधील मॅक्सवेल पहिली विकेट ठरली. यानंतर नटराजनने फटकेबाजी करणाऱ्या डार्सी शॉर्टलाही माघारी धाडले, त्याने ३४ धावा केल्या. हा धक्का कमी होता तोच मॅथ्यू वेडला चहलने आपल्या जाळ्यात अडकवत कांगारुंना पाचवा धक्का दिला, ज्यामुळे मोक्याच्या षटकांमध्ये धावा जमावण्याऐवजी कांगारुंचा संघ बॅकफूटवर फेकला गेल्यानंतर ऑस्ट्रेलियाचे फलंदाज सावरुच शकले नाहीत. टीम इंडियाकडून चहल आणि नटराजन यांनी प्रत्येकी ३-३ तर दीपक चहरने १ बळी घेतला.

तत्पूर्वी नाणेफेक जिंकत ऑस्ट्रेलियन कर्णधार फिंचने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारतीय संघाची सुरुवातच खराब झाली. मिचेल स्टार्कच्या गोलंदाजीवर पुढे येऊन खेळण्याच्या प्रयत्नात शिखर धवन माघारी परतला. यानंतर कर्णधार विराट कोहलीही फारशी चमक दाखवू शकला नाही. विराट फिरकीपटू स्वेप्सनच्या गोलंदाजीवर ९ धावा काढून माघारी परतला. एकीकडे लोकेश राहुल एक बाजू लावून धरत फटकेबाजी करत होता, परंतू दुसऱ्या बाजूने ठराविक अंतराने भारतीय फलंदाज आपली विकेट फेकत होते. संजू सॅमसन, मनिष पांडेही फारकाळ तग धरु शकले नाहीत. अर्धशतक झळकावल्यानंतर हेन्रिकेजच्या गोलंदाजीवर लोकेश राहुल बाद झाला. ४० चेंडूत त्याने ५ चौकार आणि एका षटकारासह ५१ धावा केल्या.

यानंतर मैदानावर आलेल्या हार्दिक पांड्या आणि रविंद्र जाडेजा यांनी फटकेबाजी करत भारताची धावगती वाढवण्याचा प्रयत्न केला. परंतू हार्दिक हेन्रिकेजच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात बाद झाला. यानंतर उर्वरित भारतीय फलंदाजांनी फटकेबाजी करत संघाला १६१ धावांचा टप्पा गाठून दिला. ऑस्ट्रेलियाकडून हेन्रिकेजने ३ तर स्वेप्सन-झॅम्पा आणि स्टार्क यांनी प्रत्येकी १-१ बळी घेतला.