निवडणुकीच्या निकालानंतर जयंत पाटलांनी काढला फडणवीसांना चिमटा


मुंबई – राष्ट्रवादी-काँग्रेस-शिवसेना यांच्या महाविकास आघाडीला राज्यातील पदवीधर आणि शिक्षक मतदार संघ निवडणुकीत घवघवीत यश मिळाले असून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना महाविकास आघाडीच्या विजयी उमेदवारांचे अभिनंदन करतानाच टोला लगावला आहे. राजीनामा देऊन फडणवीस यांनी पुन्हा निवडणूक लढवली तर त्यांचा महाविकास आघाडीकडून निश्चित पराभव होईल, असा खोचक टोला फडणवीस यांना जयंत पाटील यांनी लगावला आहे.

ऑपरेशन लोटस वगैरेच्या महाराष्ट्रात वल्गना केल्या जात होत्या. तीन चाकी सरकार असे हिणवले जात होते. पण या निवडणुकीत भाजपला महाविकास आघाडीची ताकद लक्षात आली असेल. राजीनामा देऊन फडणवीसांनी पुन्हा निवडणूक लढविण्याचा विचार केला, तर त्यांचा महाविकास आघाडीच्या उमेदवाराकडून पराभव होईल एवढी भक्कम आमची आघाडी असल्याचे जयंत पाटील म्हणाले.

यावेळी विजय उमेदवारांचे आणि कार्यकर्त्यांचे देखील जयंत पाटील यांनी अभिनंदन केले. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस महाराष्ट्रात एकत्र आल्यावर काय होते, हे ही निकालाने दाखवून दिले आहे. महाविकास आघाडीच्या तीनही पक्षातील व मित्र पक्षातील सर्व कार्यकर्त्यांचे, पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन व महाराष्ट्रातील जनतेचे विनम्र आभार, असे जयंत पाटील म्हणाले. महाविकास आघाडीसोबत राज्यातील शेतकरी, कष्टकरी, कामगार व मध्यमवर्गीय यांच्यासोबतच उच्चशिक्षित मतदारदेखील ठामपणे उभा आहे, हेच या निकालाने सिद्ध झाल्याचेही ते पुढे म्हणाले.