खडसेंच्या इशाऱ्यानंतर महाजनांचे स्पष्टीकरण; बीएचआर घोटाळ्याशी माझा काहीही संबंध नाही


मुंबई: भाईचंद हिरांचद रायसोनी (बीएचआर) सहकारी बँकेतील तब्बल ११०० कोटीचा घोटाळा उघड करण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी दिल्यानंतर आता भाजपकडून प्रथमच प्रतिक्रिया देण्यात आली आहे. यासंदर्भात जळगावातील एकनाथ खडसे यांचे कट्टर विरोधक गिरीश महाजन यांनी भाष्य केले आहे. माझा बीएचआर घोटाळ्याशी कोणताही संबंध नाही. सुनील झंवर हा माझा खूप आधीपासूनचा मित्र असल्यामुळे मला जाणीवपूर्वक लक्ष्य करण्यात येत असल्याचा आरोप गिरीश महाजन यांनी केला.

माझ्या नावाचा या घोटाळ्यात चुकीच्या पद्धतीने वापर झाला, असेल तर योग्य ती कारवाई झालीच पाहिजे. कोणाच्या पतसंस्थेत घोटाळा झाला, याचीही चौकशी व्हावी. पण केवळ राजकीय कारणासाठी माझ्यावर आरोप होत आहेत. याप्रकरणाची चौकशी झाल्यानंतर सत्य परिस्थिती समोर येईल, असे गिरीश महाजन यांनी सांगितले.

सुप्रिया सुळे यांना महाराष्ट्रापेक्षा राष्ट्रीय राजकारणात रस असल्याच्या शरद पवार यांच्या वक्तव्याविषयीही यावेळी त्यांना विचारणा करण्यात आली. गिरीश महाजन यांनी त्यावर फार बोलणे टाळले. कोणाला काय पद द्यावे, हा पवार कुटुंबियांचा अंतर्गत प्रश्न आहे, असे गिरीश महाजन यांनी म्हटले.

एकनाथ खडसे यांनी भाईचंद हिरांचद रायसोनी (बीएचआर) सहकारी बँकेतील तब्बल ११०० कोटी रूपयांच्या घोटाळा झाल्याचा गौप्यस्फोट केला होता. या घोटाळ्यात राज्यातील काही बड्या नेत्यांची नावे आहेत. त्यांची यादीच तयार केली आहे. मोठी गँग याप्रकरणात अडकली असल्याचा गौप्यस्फोट करतानाच ईडीने कारवाई करावी, असेच हे प्रकरण असून येत्या दोन दिवसात या घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती एकनाथ खडसे यांनी दिली होती.

खडसे यांनी बीएचआर सहकारी बँकेतील घोळ उघडकीस आल्यानंतर 2017 साली त्याविरोधात तक्रार केली होती. ही तक्रार तत्कालीन सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्याकडे करण्यात आली होती. मात्र, त्यांनी या प्रकरणी केंद्राकडे तक्रार करण्याचे सुचविले. यानुसार रक्षा खडसे यांच्यासह राधामोहन सिंग यांच्याकडे तक्रार करण्यात आली. यावेळी राधामोहन सिंग यांनी सांगितल्यानंतर संबंधित खात्याकडेही तक्रार करण्यात आली. मात्र, यापुढे चौकशी झाली नाही. यामुळे हे प्रकरण दडपण्यात आल्याचा आरोप खडसेंनी केला होता. त्यानंतर खडसे यांनी आता पुन्हा या प्रकरणाला हात घातला असून अ‍ॅड. किर्ती पाटील यांच्या माध्यमातून याप्रकरणाचा पाठपुरावा करत आहेत.