लसीचा प्राधान्यक्रम ठरविताना लोकप्रतिनिधींचा देखील अग्रकमाने समावेश करा; मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून मागणी


ठाणे : कोरोना प्रादुर्भावच्या पार्श्वभूमीवर सर्वच स्तरांतून प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी अथक परिश्रम करण्यात येत आहेत. आपला जीव धोक्यात घालून स्थानिक स्वराज्य संस्थेतील लोकप्रतिनिधी तसेच आमदार, खासदार यांनीही रुग्णांची अहोरात्र सेवा केली आहे. त्याचबरोबर या संकटकाळात अनेकांना आपला जीवही गमवावा लागला असल्यामुळे लसीकरणाचा प्राधान्यक्रम ठरविताना अग्रकमाने लोकप्रतिनिधींचा देखील समावेश करण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे महापौर नरेश म्हस्के यांनी केली आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव राज्यात झाल्यापासून आजतागायत कोणत्याही प्रकारची विम्याची सुरक्षा नसताना त्या त्या स्थानिक स्वराज्य संस्थांतील लोकप्रतिनिधी आपला जीव धोक्यात घालून कोरोना रुग्णांची अहोरात्र सेवा करीत आहेत. कोरोनायोद्धे म्हणून ठाण्याचे नगरसेवक मुकुंद केणी, विलास कांबळे, कल्याण-डोंबिवलीचे माजी महापौर राजेंद्र देवळेकर, नगरसेवक दशरथ घाडीगावकर, मीरा-भाईंदरचे नगरसेवक हरिश्चंद्र आमगावकर, पिंपरी-चिंचवडमधील नगरसेवक दत्ता साने यासह मुंबई, वसई-विरार या परिसरात काम करणाऱ्या नगरसेवकांचा यामुळे दुर्दैवी मृत्यू झाला असून अनेक लोकप्रतिनिधी कोरोनाबाधित झाले. त्यातून बरे झाल्यानंतर ते पुन्हा जनतेची सेवा करीत आहेत.

लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर अन्नधान्याचा नागरिकांना पुरवठा करणे, त्याचबरोबर त्यांना आरोग्य यंत्रणा व सुविधा उपलब्ध करून देणे, रुग्ण्वाहिका उपलब्ध करून देणे, रुग्णांना रुग्णालयात दाखल करणे, कंटेनमेंट झोन निश्चित झाल्यानंतर त्याची काटेकोर अंमलबजावणी करणे, पालिका आणि स्थानिक प्रशासनाशी सतत समन्वय साधणे, आजाराबाबत जनजागृती करणे, वेळप्रसंगी कोविड सेंटरमध्ये जाऊन रुग्णांना भेटून दिलासा देणे, आवश्यक मदत देणे अशा असंख्य कामांमध्ये नगरसेवकांनी योगदान दिले असल्यामुळे लस वितरणाचा प्राधान्यक्रम ठरवताना लोकप्रतिनिधींचाही अग्रक्रमाने समावेश करण्याची मागणी त्यांनी केली आहे.