व्हाईटवॉशची नामुष्की टीम इंडियाने टाळली, अंतिम सामन्यात १३ धावांनी विजयी


नवी दिल्ली – टीम इंडियाने अखेरच्या एकदिवसीय सामन्यांत शार्दुल ठाकूर, टी. नटराजन, जसप्रीत बुमराह यांनी केलेल्या भेदक माऱ्याच्या जोरावर ऑस्ट्रेलियाचे आव्हान मोडीत काढत बाजी मारली असून १३ धावांनी अंतिम सामन्यात विजय मिळवत टीम इंडियाने व्हाईटवॉशची नामुष्की टाळली आहे. ऑस्ट्रेलियाकडून फिंच, मॅक्सवेल यांनी फटकेबाजी करत चांगली झुंज दिली, पण भारतीय गोलंदाज मोक्याच्या क्षणी वरचढ ठरले.

ऑस्ट्रेलियाची ३०३ धावांचा पाठलाग करताना सुरुवात खराब झाली. नटराजनच्या गोलंदाजीवर वॉर्नरच्या अनुपस्थितीत सलामीला बढती मिळालेला लाबुशेन माघारी परतला. त्यानंतर फॉर्ममध्ये असणाऱ्या स्टिव्ह स्मिथला शार्दुल ठाकूरने माघारी धाडत कांगारुंची मैदानावर जम बसू पाहत असलेली जोडी फोडली. अखेरच्या एकदिवसीय सामन्यात ७ धावा काढून दोन सामन्यात शतक झळकावणारा स्मिथ माघारी परतला. यानंतर हेन्रिकेज आणि फिंच यांनी संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. या जोडीचा जम बसल्याचे दिसत असतानाच पुन्हा एकदा शार्दुल ठाकूरकडे विराटने चेंडू दिला. आपल्या कर्णधाराला शार्दुलनेही निराश न करता हेन्रिकेजला माघारी धाडत टीम इंडियाला महत्वाचा बळी मिळवून दिला.

दरम्यान एक बाजू सांभाळून असलेल्या ऑस्ट्रेलियन कर्णधार फिंचने आपले अर्धशतक पूर्ण केले. फिंचने भारतीय गोलंदाजांवर हल्लाबोल करत ८२ चेंडूत ७ चौकार आणि ३ षटकारांसह ७५ धावांची खेळी केली. फिंचला जाडेजाने माघारी धाडत ऑस्ट्रेलियाच्या अडचणींमध्ये भर टाकली. यानंतर युवा कॅमरुन ग्रीनही फारशी चमक दाखवू शकला नाही. यादरम्यान भारताचे सामन्यावर वर्चस्व होत असल्याचे दिसत असतानाच ग्लेन मॅक्सवेलने आपल्या नेहमीच्या शैलीत फटकेबाजी करत मैदानात चौफर फटकेबाजी केली. मॅक्सवेलने भारतीय गोलंदाजांची धुलाई करत ऑस्ट्रेलियाचे आव्हान कायम राखले. मॅक्सवेलने ३८ चेंडूत ३ चौकार आणि ४ षटकारांसह ५९ धावा केल्यानंतर बुमराहने त्याचा त्रिफळा उडवला. यानंतर ४७ व्या षटकांत शार्दुलने अबॉटला माघारी धाडत भारताला आणखी एक यश मिळवून दिले. यानंतर कांगारुंचे फलंदाज तग धरु शकले नाहीत. भारताकडून शार्दुल ठाकूरने ३, टी. नटराजन, जसप्रीत बुमराहने २ तर कुलदीप आणि जाडेजा यांनी प्रत्येकी १-१ बळी घेतला.

तत्पूर्वी तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाने हार्दिक पांड्या आणि रविंद्र जाडेजा यांच्यातील शतकी भागीदारी आणि कर्णधार विराट कोहलीच्या अर्धशतकी खेळाच्या जोरावर ३०२ अशा आश्वासक धावसंख्येपर्यंत मजल मारली. व्हाईववॉश टाळण्यासाठी मैदानात उतरलेल्या टीम इंडियाने अखेरच्या एकदिवसीय सामन्यात ४ बदल केले, परंतू आघाडीच्या फळीतील फलंदाजांच्या खराब कामगिरीचे सत्र या सामन्यातही सुरुच राहिले. त्यानंतर विराट आणि पांड्याने संयमी खेळ करत भारताची अधिक पडझड होणार नाही याची काळजी घेतली. अखेरच्या षटकांमध्ये कांगारुंची धुलाई करत पांड्या-जाडेजा जोडीने भारताला दमदार पुनरागमन करुन दिले. पांड्याने नाबाद ९२ तर जाडेजाने नाबाद ६६ धावा केल्या.