प्रीतम मुंडेंचा महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्लाबोल


जालना : खुद्द शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी अभिनेत्री ऊर्मिला मातोंडकर यांच्या शिवसेना प्रवेशावर शिक्कामोर्तब केल्यानतंर भाजप खासदार प्रीतम मुंडे यांनी ऊर्मिला मातोंडकर यांना शुभेच्छा देत शिवसेनेला टोला लगावला आहे.

प्रीतम मुंडे यांनी जालन्यातील पत्रकार परिषदेत महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. केंद्राच्या पीएम निधीमधून प्रत्येक जिल्ह्यातील रुग्णालयांमध्ये व्हेंटिलेटर हे आले असून यात राज्याच्या कोणताही वाटा नाही. राज्य सरकारकडून कोविड सेंटर उभारण्यात अक्षम्य दिरंगाई झाल्याची टीका प्रीतम मुंडे यांनी केली.

शिवसेनेत ऊर्मिला मातोंडकर या प्रवेश करणार असल्याचे ऐकले आहे. माझ्या मातोंडकर यांना शुभेच्छा आहे. त्यांनी काँग्रेसकडून अगोदर नशीब आजमावले, त्यात त्यांना अपयश आले होते. आता बघू त्यांचे नशीब बदलते की शिवसेनेचे नशीब बदलते, असा टोलाही प्रीतम मुंडे यांनी सेनेला लगावला.

हे सरकार कंगना राणावत आणि अर्णब गोस्वामी यांच्या बाबतीत सुडाचे राजकारण करणारे असून आमच्या अनेक निर्णयांना या सरकारने स्थगिती दिल्यामुळे हे महाविकास आघाडीचे बिघाडी आणि स्थगिती सरकार असल्याची टीकाही मुंडे यांनी केली.

फक्त बदल्या आणि नवीन गाड्या घेण्याचे काम राज्य सरकारने केले आहे. शेतकऱ्यांना अनेक माध्यमातून आमच्या काळात सरकारने मदत दिली. पण सर्व बाबतीत आताचे राज्य सरकार सपशेल अपयशी ठरले आहे. आमच्यासोबत असताना शेतकऱ्यांना 50 हजार रुपये मदत मागणाऱ्यांना आज स्वतःचे सरकार असताना शेतकऱ्यांचा विसर पडला असल्याची थेट टीका प्रीतम मुंडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता केली.

हे सरकार महिला, विद्यार्थी, तरुण, मजूर कोणत्याच घटकाला न्याय देण्यात अपयशी ठरले आहे. राज्य सरकारची वर्षपूर्ती झाली असली तरी जनतेच्या निराशेची वर्षपूर्ती झाली आहे. त्यामुळे लवकरच सरकार जिथून आले, तिथे परत जाणार आहे, असे भाकीतच प्रीतम मुंडे यांनी वर्तवले आहे. महिलांना स्वसुरक्षेसाठी हत्यारापेक्षा शालेय स्तरापासून स्वसंरक्षणाचे धडे दिले पाहिजे, अशी पंकजा मुंडे यांनी भूमिका मांडली होती. जर आमचे सरकार असते, तर आता पर्यंत त्याची अंमलबजावणी झाली असती, असेही प्रीतम मुंडे म्हणाल्या.

लोकांची शेतकरी कायद्याबाबत दिशाभूल करून केंद्र सरकारबाबत रोष निर्माण केला जात असून राज्य सरकारकडून पत्रकार, कलाकार आणि जनतेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात असल्यामुळे महाविकास आघाडी सरकार हे स्वतः अस्ताकडे चालल्याची टीकाही प्रीतम मुंडे यांनी केली.