शेतकऱ्यांचा दहशतवादी म्हणून उल्लेख केल्याने संजय राऊतांचा पारा चढला


मुंबई – हजारो शेतकऱ्यांनी आणखी एक रात्र थंडीत काढल्यानंतर सलग चौथ्या दिवशी रविवारी केंद्राच्या नव्या कृषि विधेयकाच्या विरोधातील आंदोलन सुरूच ठेवले. दरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शेतकऱ्यांविरोधात करण्यात आलेल्या कारवाईवरुन संताप व्यक्त केला आहे. शेतकरी काय दहशतवादी आहेत का ? अशी विचारणा संजय राऊत यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना केली आहे.

तुमचा जो शेतकरी अन्नदाता आहे, तुम्ही त्याला दहशतवादी, देशद्रोही म्हणत आहात. महाराष्ट्राप्रमाणे पंजाब, हरियाणामधील शेतकरी आहे. ज्यांनी हा देश सुजलाम सुफलाम व्हावा यासाठी प्रयत्न केला, जी प्रमुख राज्ये आहेत, त्यामध्ये महाराष्ट्र, पंजाब आणि हरियाणाचा समावेश आहे. शेतकरी काय दहशतवादी आहेत का?, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

आमचे केंद्र सरकारच्या नव्या कृषि विधेयकाच्या विरोधात आंदोलन सुरूच राहणार असून दिल्लीचे पाचही प्रवेशमार्ग आम्ही बंद करू, दिल्लीच्या सीमांवर असे गेले ४ दिवस ठिय्या मांडून बसलेल्या शेतकऱ्यांनी रविवारी सांगितले. जगासमोर पंजाबच्या शेतकऱ्यांनी आदर्श ठेवत शांततेत केलेले आंदोलन या देशाच्या इतिहासात कधी झाले नव्हते. शेतकऱ्यांवर ज्याप्रकारे बळाचा वापर केला जात आहे हा बळाचा वापर जर चीनच्या सीमेवर केला असता तर लडाखमध्ये चीनचे सैन्य घुसले नसते, असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला आहे.

ते पुढे म्हणाले की, शेतकऱ्यांचे सर्वांनीच समर्थन केले पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्वात आधी समर्थन केले पाहिजे. तिथे जाऊन शेतकऱ्यांशी चर्चा केली पाहिजे. जेव्हा तुम्ही सत्तेत नव्हता आणि दिल्लीत येण्याचा मार्ग तयार करत होतात तेव्हा याच शेतकऱ्यांवर अत्याचार होणार नाही अशा घोषणा दिल्या होत्या. मग दिल्लीच्या सीमेवर आज काय सुरु आहे? शेतकरी दहशतवादी नाही. शेतकरी आहे म्हणून देश आहे.

संजय राऊतांचे नाव घेतले की कानाला त्रास होतो, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. संजय राऊत यांनी त्याला उत्तर देताना म्हटले आहे की, चांगली गोष्ट आहे. आमचे नाव घेतले की कानाला, पोटाला, डोळ्याला, ह्रदयाला त्रास झालाच पाहिजे. म्हणूनच उद्धव ठाकरेंनी माझी नेमणूक केली आहे. संजय राऊत उर्मिला मातोंडकरांच्या शिवसेना प्रवेशासंबंधी बोलताना म्हणाले की, त्या शिवसैनिकच आहेत. त्यांच्यामुळे महिला आघाडी मजबूत होईल.