भाजप खासदाराचा दावा; पंधरा दिवसात पडणार ममता बॅनर्जी सरकार


कोलकाता – पुढील वर्षी होणाऱ्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या तयारी आतापासूनच सुरुवात झाली असून पश्चिम बंगालमध्ये सध्या फोडाफोडीच्या आणि पक्षांतराच्या राजकारणाला जोर आला आहे. राज्यात गेल्या दहा वर्षांपासून सत्तेवर असलेल्या ममत बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला फुटीचे ग्रहण लागले असून, पक्षाला काही बड्या नेत्यांसह अनेक आमदार सोडचिठ्ठी देत आहेत.

त्यातच आता ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील सरकारबाबतही अनेक दावे केले जात आहेत. आमच्या संपर्कात तृणमूल काँग्रेसचे ६२ आमदार असून, ममता सरकार येत्या १५ डिसेंबरपर्यंत पडणार असल्याचा दावा भाजपाचे खासदार सौमित्र खान यांनी केला आहे.

सौमित्र खान म्हणाले की, आमच्या संपर्कात तृणमूल काँग्रेसचे ६२ आमदार असून ते कधीही पक्ष बदलू शकतात. १५ डिसेंबरपर्यंत आम्ही तृणमूल काँग्रेसमध्ये फूट पाडणार आहोत. ममता बॅनर्जी यांना अशा परिस्थितीत सरकार चालवणे कठीण जाणार आहे. दरम्यान, सध्या ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील सरकारकडे स्पष्ट बहुमत आहे.

कालही ममता बॅनर्जी सरकार अस्थिर झाल्याचा दावा सौमित्र खान यांनी केला होता. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना राज्याच्या विधानसभेत बहुमत सिद्ध करण्याचे आदेश राज्यपाल जगदीप धनखड हे देऊ शकतात, असा दावा केला होता.

ममता बॅनर्जी सरकारमधील बलाढ्य मंत्री शुभेंदू अधिकारी यांनी काही दिवसांपूर्वी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यापासून ममता सरकार अस्थिर झाल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. आता तृणमुल काँग्रेस सोडून शुभेंदू अधिकारी हे भाजपमध्ये दाखल होतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. ममता बॅनर्जी आणि तृणमूल काँग्रेससाठी हा मोठा धक्का ठरू शकतो. शुभेंदू अधिकारी हे मिदनापूरमधील बलाढ्य नेते आहेत. तसेच आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्ये त्यांचा चांगला प्रभाव आहे.

दरम्यान, तृणमूलचे ६२ आमदार आपल्या संपर्कात असल्याचा भाजपने दावा करून पश्चिम बंगालमधील वातावरण तापवले आहे. पण तृणमूलच्या संपर्कात भाजपचेच तीन ते चार खासदार आणि काही नेते असल्याचा दावा करून तृणमूल काँग्रेसने भाजपला प्रत्युत्तर दिले आहे. पण यावर अद्याप भाजपकडून प्रतिक्रिया जाहीर करण्यात आलेली नाही.