संजय राऊत यांनी केला वर्षभरापूर्वीच्या सत्तानाट्याचा गौप्यस्फोट


मुंबई – अजित पवार यांनी गेल्यावर्षी राज्यातील सत्तानाट्यामध्ये भाजपसोबत जाऊन राजभवनावर भल्या पहाटे शपथविधीचा कार्यक्रम उरकला होता. खासदार संजय राऊत यांनी ही घटना का घडली होती याबाबत गौप्यस्फोट केला आहे. नेहरु सेंटरमधील २२ नोव्हेंबर २०१९ रोजीच्या त्या बैठकीतील चर्चेनंतर तडकाफडकी अजित पवार यांनी निर्णय घेतल्याचे स्पष्टीकरण राऊत यांनी सामनातील रोखठोक या आपल्या सदरातून केले आहे.

राऊत म्हणाले, सत्तेसाठीच्या वाटाघाटी नेहरु सेंटरमध्ये २२ नोव्हेंबर रोजी सुरु असताना मल्लिकार्जुन खर्गे यांच्या एका वक्तव्याने ठिणगी पडली होती. खर्गे विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी ठाम होते. खर्गे आणि शरद पवार यांच्यात यावरुन शाब्दिक चकमक झाली. त्यावेळी पवार खूपच संतापले होते, त्यामुळे ते बैठकीतून उठले आणि निघून जाऊ लागले. याच बैठकीत महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असतील, हे शरद पवार यांनी सुचवले होते. पण खर्गे आणि पवार यांच्या चकमकीने बैठकीचा नूर पालटला होता. यावेळी बराच वेळ खाली मान घालून मोबाईलवर अजित पवार चॅटिंग करत होते. त्यानंतर त्यांचा फोन स्वीच ऑफ झाला आणि दुसऱ्या दिवशी पहाटे त्यांचे थेट राजभवनावर शपथविधी सोहळ्यातच दर्शन झाले.

शरद पवार आणि अमित शहा यांच्यात देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या पहाटेच्या शपथविधीपूर्वी दिल्लीत बैठक झाल्यामुळे पहाटेच्या शपथविधीचे नाट्य तयार झाले ही चर्चा सर्वस्वी चूक असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. पवार आणि माझ्यामध्ये दिल्लीत उत्तम संवाद होत होता. आम्ही रोजच भेटत होतो. त्याचबरोबर ते भाजपसोबत डील करण्याच्या मनस्थितीत नव्हते. पण भाजपकडून ऑफर्स येत असल्याचे सांगत होते. पंतप्रधान मोदींची लवकरच भेट घेऊन भाजपसोबत सरकार स्थापन करणे शक्य नसल्याचे, आपण त्यांना सांगणार असल्याचेही त्यांनी मला सांगितले होते. याच काळात पवारांनी शेतकरी प्रश्नांसंदर्भात मोदींची भेट घेतली आणि राज्यातील सत्तेबाबतही स्पष्टीकरण दिल्यामुळे शरद पवारांनी भाजपला शब्द दिला होता, त्यामुळेच पहाटेच्या हालचाली झाल्या हे खोटे असल्याचे राऊत यांनी रोखठोकमधून स्पष्ट केले आहे.

आत्तापर्यंत चार पुस्तके वर्षभरापूर्वी झालेल्या ३६ दिवसांच्या सत्तानाट्यावर आली. पण या घटनेचा मी प्रत्यक्ष साक्षीदार आहे त्यामुळे यावर मी कधी पुस्तक लिहिणार, असे मला एका संपादकांनी मुलाखतीत विचारले होते. मी त्यांना सांगितले जर यावर मी पुस्तक लिहिले तर इतर चार पुस्तके खोटी ठरतील. त्यामुळे शरद पवार आणि माझी मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर गुप्त बैठक झाल्याचे खोट असून त्यांना मी नेहमीच उघडपणे भेटतो. त्यामुळे सत्तानाट्याची ही पटकथा अद्याप पडद्यामागेच आहे व राहिल, असेही राऊत यांनी स्पष्ट केले आहे.