अमित शहांचा प्रस्ताव आंदोलक शेतकऱ्यांनी फेटाळला


नवी दिल्ली – दिल्ली सीमेवर निषेध आंदोलनाचा केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात रस्त्यावर उतरलेल्या पंजाब आणि हरयाणातील शेतकऱ्यांचा आजचा चौथा दिवस असून या शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मांडलेला चर्चेचा प्रस्ताव धुडकाऊन लावला आहे. तसेच सिंघू बॉर्डर येथे संध्याकाळी चार वाजता माध्यमांसमोर ते आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत.

शेतकऱ्यांनी स्पष्ट केले आहे की, बुराडी येथील निरंकारी मैदानात आंदोलन करणार नाहीत तर सिंघू बॉर्डवरच ठिय्या आंदोलन करतील. लेखी स्वरुपात पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांकडून चर्चेचे निमंत्रण मिळाले तरच चर्चा होईल, असा पवित्राही त्यांनी घेतला आहे. दरम्यान, दिल्लीच्या सीमेवर होत असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीत कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. त्याचबरोबर पंजाबचे चार लोक सी हेक्सागन इंडिया गेटजवळील पंजाब भवनासमोर आज सकाळी पोहोचले होते. ते कृषी कायद्यांविरोधात या ठिकाणी आंदोलन करणार आहेत. त्यांना सध्या बुराडी येथे पाठवण्याची तयारी सुरु करण्यात आली आहे. एकीकडे शेतकऱ्यांनी बुराडी येथे आंदोलन करण्यास नकार दिला आहे तर दुसरीकडे निरंकारी समागम मैदानात या आंदोलनासाठी जोरदार तयारी सुरु आहे.

दरम्यान, दिल्लीचे गृहमत्री सत्येंद्र जैन यांनी शेतकऱ्यांचे आंदोलन आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या अटींदरम्यान मोठे वक्तव्य केले आहे. कोणत्याही प्रकारची अट शेतकऱ्यांशी चर्चेसाठी असता कामा नये, चर्चा लवकरात लवकर व्हायला हवी. ते आपल्या देशाचे शेतकरी आहेत. त्यांना जिथे पाहिजे तिथे आंदोलनाची परवानगी मिळायला हवी, असेही त्यांनी म्हटले आहे.