नारायण राणे यांची उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका


मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची अवस्था नाचता येईना अंगण वाकडे अशी असल्याची टीका माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे. नारायण राणेंनी आज सामनाला उद्धव ठाकरेंनी दिलेल्या मुलाखतीवर कडाडून टीका केली आहे. ६५ हजार कोटींचे कर्ज या सरकारने मागील सहा महिन्यात काढून ठेवले आणि राज्य दिवाळखोरीत नेल्याचाही आरोप नारायण राणे यांनी केला.

त्याचबरोबर त्यांनी हात धुवून मागे लागेन अशी धमकी दिली आहे, ती नेमकी कशाच्या जीवावर दिली आहे? उद्ध्वस्त करणाऱ्या मार्गावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी जाऊ नये विकासाच्या मार्गावर जावे, असाही सल्ला नारायण राणे यांनी दिला आहे. नारायण राणे यांनी हे वक्तव्य एबीपी माझाच्या माझा महाराष्ट्र माझे व्हिजन या कार्यक्रमात केले आहे. महाराष्ट्राला उद्धव ठाकरेंसारखा मुख्यमंत्री मिळणे हे महाराष्ट्राचे दुर्दैव असल्याचेही नारायण राणे यांनी म्हटले आहे.

तीन पक्षांचे हे सरकार असून जनतेच्या भावनेशी गद्दारी करुन आलेले हे सरकार आहे. पण हे सरकार फार काळ टीकणार नसल्याचेही नारायण राणेंनी म्हटले आहे. नारायण राणेंनी यावेळी मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरही भाष्य केले आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या बाजूने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे नव्हते, कधीही मराठा समाजाला आरक्षणाचे त्यांनी समर्थन केलेले नाही. सर्वोच्च न्यायालयात चांगले वकील नेमण्याची गरज असल्याचेही नारायण राणे यांनी म्हटले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मातोश्रीच्या पिंजऱ्यात अडकले आहेत. संजय राऊत ते कार चालवतात याचे कौतुक करत आहेत. पण महाराष्ट्राला ड्रायव्हर नको आहे सक्षम मुख्यमंत्री हवा असल्याचीही टीका नारायण राणे यांनी केली आहे. जे तीन पक्षांचे सरकार महाराष्ट्रात आहे ते सरकार महाराष्ट्र हिताचे नसल्यामुळे हे सरकार जाण्यासाठी जर कुणी प्रयत्न केले तर ते मी गैर मानणार नसल्याचेही नारायण राणेंनी म्हटले आहे.