विकृत बुद्धीचे चाळे तुम्ही करु नका, उद्धव ठाकरेंचा विरोधकांना इशारा


मुंबई : महाविकास आघाडी सरकारच्या एक वर्षपूर्तीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाला मुलाखत दिली. ही मुलाखत शिवसेना खासदार आणि सामनाचे संपादक संजय राऊत यांनी घेतली. वर्षा ते मातोश्री, काँग्रेस-राष्ट्रवादीशी समन्वय, विरोधकांचे आरोप, सरकार चालवतानाची कसरत यासंदर्भात अनेक प्रश्नांची या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी उत्तरे दिली. दरम्यान तुम्ही जर ईडीचा गैरवापर करुन दबाव आणायचा प्रयत्न करत असाल तर याद राखा. मुलाबाळांच्या मागे लागून विकृत आनंद मिळवणाऱ्यांनो तुम्हालाही कुटुंबे आहेत. मुलेबाळ आहेत हे विसरु नका. पण आमच्यावर संस्कार आहेत म्हणून संयम ठेवल्याचा इशारा उद्धव ठाकरेंनी दिला.

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, मी शांत संयमी आहे याचा अर्थ मी नामर्द आहे असा होत नाही. आमच्या लोकांच्या कुटुंबियांवर ज्या पद्धतीने हल्ले सुरु झाले आहेत, ही पद्धत निदान महाराष्ट्राची तरी नाही. हिंदुत्ववादी म्हटल्यावर एक संस्कृती आहे आणि तुम्ही कुटुंबिया आणि मुलाबाळांवर येणार असाल तर आमच्या अंगावर येणाऱ्यांना ज्यांना कुटुंबे आणि मुलंबाळ आहेत, त्यांना मी सांगू इच्छितो की तुम्हालाही कुटुंबे आणि मुलेबाळ आहेत. धुतल्या तांदळासारखे तुम्ही नाहीत. तुमची खिचडी कशी शिजवायची ती आम्ही शिजवू शकतो.

सीबीआयचा दुरुपयोग करायला तुम्ही लागलात, तेव्हा अशी वेसण घालावेच लागते. ईडी, सीबीआय काय त्यावर राज्याचा अधिकार नाही? आम्ही नावे देतो, आमच्याकडे नावे आहेत. मालमसाला तयार आहे. म्हणून काय सुडाने जायचे का? मग आपल्याकडून जनतेने काय अपेक्षा ठेवायच्या. सुडानेच वागायचे असेल तर तुम्ही एक सूड काढा, आम्ही दहा सूड काढू, असाही इशारा उद्धव ठाकरेंनी दिला.

हात धुवा या पलिकडे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री काय सांगणार? या प्रश्नावर मुख्यमंत्री म्हणाले की, ठिक आहे, मी हात धुतो, जास्त अंगावर आले तर हात धुवून मागे लागेल. विकृत बुद्धीचे चाळे तुम्ही करु नका. विकृती ही विकृती असते. आव्हान जेव्हा मिळते, तेव्हा मला अधिक स्फूर्ती येते. कुणी कितीही आडवे आले तरी आडवे येणाऱ्यांना आडवे करुन महाराष्ट्र पुढे जाईल, असे ठाकरे म्हणाले.