चंद्रकांतदादा बावचळले आहेत, तोंडाला येईल ते बडबडतात – अजित पवार


नांदेड: सध्या भाजपचे नेते महाराष्ट्रासारख्या सुसंस्कृत राज्यात तोंडाला येईल ते बडबडबत असल्याची टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. कोणाबद्दल काहीही भाजपचे नेते बोलतात. त्यातच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे तर बावचळल्यासारखे बोलत असल्याची टीकाही अजित पवार यांनी केली.

अजित पवार हे शुक्रवारी नांदेडमध्ये मराठवाडा पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या प्रचारासाठी आले होते. यावेळी प्रचारसभेत त्यांनी भाजपच्या नेत्यांचा समाचार घेतला. भाजपमधील कार्यकर्ते कुठे जाऊ नयेत, यासाठी सरकार पडेल असे गाजर दाखवण्याचे काम सुरु आहे. तरीदेखील आमच्याकडे एकनाथ खडसे आणि जयसिंगराव गायकवाड यांच्यासारखे नेते आल्याचे अजित पवार यांनी सांगितले.

काहीवेळा महाविकासआघाडी सरकार चालवताना अडचणी येतात. पण निर्णय थोडे मागे-पुढे करुन घ्यावे लागतात. राज्याचे हित हेच आमचे समान धोरण आहे. महाराष्ट्र आजवर कधी दिल्लीश्वरांपुढे झुकला नसल्याचे अजित पवार यांनी ठणकावून सांगितले. यावेळी तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना एकदिलाने काम करण्याचे आवाहन अजित पवार यांनी केले.

काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना हे तिन्ही पक्ष एकत्रितपणे निवडणूक लढवत आहेत. मी असे कधी माझ्या 30 वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत पाहिले नव्हते. तिन्ही पक्षांनी एकत्र बसून जागावाटप केल्यामुळे आता व्यक्तिगत हेवेदावे करुन वातावरण गढूळ करु नका. आपल्या पक्षाच्या वरिष्ठांनी घेतलेल्या निर्णयाचे पालन करणे हे कार्यकर्ता म्हणून आपले कर्तव्य असल्याचे अजित पवार यांनी म्हटले.

केंद्र सरकारकडून राज्यातील महामार्गांच्या कामावर होणाऱ्या दुर्लक्षावरही यावेळी अजित पवार यांनी भाष्य केले. तसेच राज्याच्या हक्काच्या जीएसटीचाही मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले, केंद्र सरकारच्या राष्ट्रीय महामार्गांची कामे रखडली आहेत. केंद्राकडे 28 हजार 700 कोटी बाकी आहे. राज्याचे हे हक्काचे पैसे का दिले नाही? 12 हजार कोटी पगारांवर खर्च होत आहेत. निसर्ग चक्री वादळात मागच्या सरकारपेक्षा जास्त मदत दिली. परतीच्या पावसात मोठे नुकसान झाले. एसटीला देखील आम्ही पॅकेज दिले.