नरेंद्र मोदीकडून ‘वन नेशन, वन इलेक्शन’ची गरज असल्याचा पुनरुच्चार


नवी दिल्ली: अखिल भारतीय पीठासीन अधिकाऱ्यांच्या संमेलनाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या प्रगतीसाठी ‘वन नेशन, वन इलेक्शन’ची गरज असल्याचा पुनरुच्चार करत यावर गांभीर्याने विचारमंथन आवश्यक असल्याचे म्हटले आहे. मोदींनी संविधान दिनाच्या पार्श्वभूमीवर पीठासीन अधिकाऱ्यांशी संवाद साधला.

‘वन नेशन, वन इलेक्शन’ केवळ विचारमंथनाचा विषय नसून ही देशाची गरज आहे. आपल्याकडे आता काही महिन्यांनी देशातील कुठल्या ना कुठल्या राज्यात निवडणुका होत असतात. ज्यामुळे सुरु असलेल्या विकासकामात अडथळा निर्माण होतो आणि देशाच्या प्रगतीचा वेग मंदावतो. आपण सर्वांनी याबाबत गांभीर्याने विचार करायला हवा, असे मत मोदींनी व्यक्त केले. केवळ एका मतदारयादीचा वापर लोकसभा, विधानसभा आणि अन्य निवडणुकांसाठी व्हायला हवा. या मतदारयाद्यांवर आपण पैसा आणि वेळ का खर्च करत आहोत, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

पंतप्रधानांनी यावेळी देशातील जनतेला संविधान दिनाच्या शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर संविधानाच्या निर्मितीत सहभागी असलेल्या प्रत्येक व्यक्तीचा मी आभारी असून डॉ. राजेंद्र प्रसाद आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्यापासून संविधान तयार करण्यात हातभार लावलेल्या प्रत्येकाला मी नमन करतो. देशाला त्यांच्यामुळेच संविधान मिळाले. पूज्य बापूंकडून मिळणारी प्रेरणा आणि सरदार पटेल यांची वचनबद्धता यांना प्रणाम करण्याचा आजचा दिवस असल्याचे मोदी म्हणाले.

त्याचबरोबर मुंबईवर १२ वर्षांपूर्वी झालेल्या दहशतवादी हल्ल्यावरही मोदींनी भाष्य केले. १२ वर्षापूर्वी आजच्याच दिवशी देशावर सर्वात मोठा दहशतवादी हल्ला झाला होता. आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईवर पाकिस्तानातून आलेल्या दहशतवाद्यांनी हल्ला केला. यात अनेकांना आपला जीव गमवावा लागला. परदेशातून आलेले लोक मारले गेले. मी त्यांना श्रद्धांजली वाहतो, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.