आशिया खंडात भारत लाचखोरीत अव्वलस्थानी


नवी दिल्ली – एका सर्वेक्षणातून सर्वाधिक लाचखोर संपूर्ण आशिया खंडात भारतात असल्याचे समोर आले आहे. भारतात लाचखोरीचे प्रमाण हे ३९ टक्के असल्याचे या ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलने केलेल्या सर्वेक्षणात सांगण्यात आले आहे. भ्रष्टाचारात गेल्या १२ महिन्यांत वाढ झाल्याचे ४७ टक्के लोकांचे म्हणणे आहे.

या सर्वेक्षणात सहभागी झालेल्या ६३ टक्के लोकांचे सरकार भ्रष्टाचार संपवण्यासाठी योग्य पावले उचलत असल्याचे म्हणणे आहे. भारतात आपले काम करुन घेण्यासाठी ४६ टक्के लोक वैयक्तिक संबंधांचा फायदा उठवतात. लाचखोरीच्या प्रकरणांमध्ये जवळपास निम्म्या लोकांकडून लाच मागण्यात आली आहे. तर वैयक्तिक संबंधांचा वापर करणाऱ्या ३२ टक्के लोकांचे म्हणणे आहे की जर त्यांनी असे केले नाही तर त्याचे काम होतच नाही. भारतानंतर कंबोडिया दुसऱ्या क्रमांकावर आहे. या देशातील ३७ टक्के लोक लाच देतात. यानंतर इंडोनेशिया भ्रष्टाचाराचे प्रमाण ३० टक्के असल्याने तिसऱ्या स्थानी आहे. तर मालदीव आणि जपान सर्वात कमी लाचखोरी चालणारे देश आहेत. दोन टक्के लोकच या दोन्ही देशांमध्ये लाच घेतात. आशिया खंडातील दक्षिण कोरियामध्ये भ्रष्टाचाराचा दर १० टक्के आहे. तसेच नेपाळमध्ये १२ टक्के लोकच भ्रष्टाचार करतात. पण सर्वेक्षणात पाकिस्तानचा समावेश करण्यात आलेला नाही.

‘ग्लोबल करप्शन बॅरोमीटर-आशिया’ या नावाने ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलने आपला अहवाल सादर केला आहे. १७ देशांतून २०,००० लोकांना यामध्ये प्रश्न विचारण्यात आले. जून आणि सप्टेंबर या महिन्यांदरम्यान हे सर्वेक्षण करण्यात आले होते. सहा प्रकारच्या सरकारी सेवांचा या सर्वेक्षणात समावेश करण्यात आला आहे. यामध्ये प्रत्येक चार लोकांपैकी तीन जणांनी त्यांच्या देशात भ्रष्टाचार ही मोठी समस्या असल्याचे म्हटले आहे.

भारतातील ज्या लोकांचा सर्वेक्षणामध्ये समावेश करण्यात आला होता. यांपैकी ४२ टक्के लोकांनी पोलिसांना लाच दिली आहे. सरकारी ओळखपत्र मिळवण्यासाठी ४१ टक्के लोकांना लाच द्यावी लागली. अहवालात या गोष्टीचाही खुलासा करण्यात आला की, ६३ टक्के लोकांना भ्रष्टाचाराची माहिती देण्यास भीती वाटते.