अर्णब गोस्वामींशी भाजपचा काडीमात्र संबंध नाही – रावसाहेब दानवे


मुंबई – अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना अटक झाल्यानंतर राज्य सरकारवर भाजपकडून मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली. त्याचबरोबर त्यांच्या सुटकेची मागणी करत आंदोलन देखील करण्यात आले होते. त्याचाच वचपा काढत शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घर आणि कार्यालयावर ईडीच्या माध्यमातून धाड टाकल्याचा आरोप केला जात आहे. यावर पत्रकार परिषदेत बोलताना अर्णब गोस्वामी आणि भाजपचा काडीमात्र संबंध नसल्याचे भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी म्हटले आहे.

अर्णब गोस्वामी यांच्यासारखे आपल्या देशात अनेक चॅनेल आहेत. आमच्याबद्दल ते काही बोलत नाहीत का? माझ्यासह भाजपच्या इतर नेत्यांवर टीका करत नाही का? पण तुमच्यावर एखादे चॅनेल टीका करते म्हणून ते भाजपचे होते का? अर्णब गोस्वामींशी आमचा काही संबध नाही. त्यांनी केलेली कारस्थाने आपोआप उघड होऊ लागल्याचे रावसाहेब दानवे यांनी म्हटले आहे.

ईडीच्या कारवाया जेवढ्या आमच्यावर झाल्या आहेत तेवढ्या कोणावर झालेल्या नाहीत. ज्यांचे हात बरटलेले नसतील तर घाबरायचे कारण नाही. काहीच नसेल तर ईडी आणि सीडीला घाबरता का? मन साफ असेल तर काहीही होऊ द्या. हे नैराश्यातून केलेले आरोप असल्याचे रावसाहेब दानवेंनी पुढे म्हटले आहे.

भाजपचे सरकार राज्यात येणार असल्याच्या दाव्यासंबंधी विचारले असता दानवे म्हणाले की, दोन महिन्यात राज्यात भाजपचे सरकार येईल. पण सरकार कसे येईल याचे नियोजन मी तुम्हाला कसे सांगू?. रावसाहेब दानवे शरद पवारांनी ज्योतिषी उल्लेख केल्याच्या टीकेला उत्तर देताना म्हणाले की, शरद पवारांना माझ्यावर टीका करण्याचा अधिकार आहे. ते महाराष्ट्राचे मोठे नेते आहेत. त्यांच्यावर मी टीका करणार नाही. पण मला एक गोष्ट कळते की या राज्यातील सरकार आणि त्यांच्या कारभारावर जनता नाराज आहे. हा माझ्या भविष्याचा प्रश्न नाही.