भाजपच्या लव्ह जिहाद कायद्याच्या मागणीला संजय राऊतांचे आव्हान


मुंबई – देशात मागील अनेक दिवसांपासून लव्ह जिहाद प्रकरण चर्चेत असून लव्ह जिहाद विरोधात मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशमध्ये कायदा केला जाणार अशी चर्चा असतानाच हा मुद्दा महाराष्ट्रातही उपस्थित केला जात आहे. महाराष्ट्रातील लव्ह जिहादच्या घटना रोखण्यासाठी कायदा करण्यात यावा, अशी मागणी भाजप नेत्यांकडून केली जात आहे. शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी भाजपाच्या मागणीला उत्तर देत आव्हान दिले आहे.

निवडणुकीत विकास हाच महत्त्वाचा मुद्दा असतो. पण, सध्या लव्ह जिहादचा मुद्दा समोर आला आहे. त्याचे स्वागत करतो. काही नेते महाराष्ट्रात असा कायदा कधी होणार, असे म्हणत आहेत. मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशात कायदा केला जाणार आहे. राज्यातील काही भाजपचे जे प्रमुख नेते विचारत आहेत की, महाराष्ट्रात हा कायदा कधी होणार? यावर आज सकाळी माझी मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली. आम्ही या विषयावर एवढेच सांगू की, आधी उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशात कायदा होऊ द्या. पण, जेव्हा बिहारमध्ये नितीश कुमार लव्ह जिहादचा कायदा आणतील. आम्ही त्या कायद्याचा अभ्यास करू. त्यानंतर महाराष्ट्रात कायदा आणण्याविषयी विचार करू. भाजपचे सरकार बिहारमध्ये आहे. नितीश कुमार भाजपचेच मुख्यमंत्री आहेत. कारण सर्वात जास्त जागा भाजपच्या आहेत. नितीश कुमार तिसऱ्या क्रमांकावर असल्यामुळे मुख्यमंत्री भाजपचाच असल्याचे संजय राऊत म्हणाले.

देशात आणि महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून लव्ह जिहाद विषयावर महाराष्ट्रातील विरोधी पक्ष, तसेच देशात जिथे भाजपची सत्ता नाही, तिथे लव्ह जिहादसंबंधी कायदा करा अशी मागणी होत आहे. बहुधा पश्चिम बंगाल निवडणुकीसाठी हे होत आहे. यासंबंधी मी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशात कायदा होतो आहे. महाराष्ट्रात करा असा हट्ट केला जात आहे. मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशचे राहू दे…बिहारमध्ये नितीश कुमार जवळजवळ भाजपचेच मुख्यमंत्री आहेत. सर्वात आधी बिहारमध्ये कायदा करा. नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली जो कायदा तिथे बनवला जाईल त्याचा अभ्यास करु आणि नंतर महाराष्ट्रात विचार करु. राज्यात लव्ह जिहाद नव्हे, तर कोरोनाचे मोठे संकट असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

अर्थव्यवस्था सर्वात महत्त्वाचा मुद्दा असून देशात बेरोजगारी, महागाई या मुद्यांपेक्षा मोठा लव्ह जिहाद असेल, तर आधी बिहारमध्ये कायदा होऊ द्या. अभ्यास करून महाराष्ट्रात कायदा करण्याचा विचार करू. भाजप नेत्यांना पंतप्रधानांचे म्हणणे समजत नाही. दुसऱ्या महायुद्धापेक्षाही भयंकर संकट असल्याचे पंतप्रधान सांगत आहेत. पण, महाराष्ट्रात भाजपचेच नेते पंतप्रधानांचेच ऐकत नाही. उलट आंदोलन करत आहेत. रस्त्यावर उतरत आहे, जसे काही हे कोरोनाचेच बाप असल्याचा टोला राऊत यांनी लगावला आहे.