आपला मुख्यमंत्री, आपले नशीब, आपले दुर्दैव, आपली जबाबदारी, म्हणत संदीप देशपांडेंची उद्धव ठाकरेंवर टीका


मुंबई – रविवारी रात्री ८ वाजता सोशल मीडियाच्या माध्यमातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी लाईव्ह संवाद साधला. त्यांनी यावेळी कोरोनाच्या सध्याच्या स्थितीबाबत आणि अनलॉकबाबत बोलताना जनतेला अधिक सावध राहण्याचा संदेश दिला. मुख्यमंत्री या संबोधनात कोरोनासोबतच राज्यातील इतरही महत्त्वाच्या विषयांवरही भाष्य करतील अशी अपेक्षा जनतेला होती, पण मुख्यमंत्री ठाकरे यांनी या विषयांवर बोलणे टाळल्यामुळे त्यांच्या रविवारच्या फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून केलेल्या संबोधनावर अनेकांकडून टीका करण्यात येत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनीदेखील खोचक टोला लगावला आहे.


भाजपाच्या काही नेत्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संबोधनानंतर मुख्यमंत्र्यांवर टीका केली. विविध विषयांचा समावेश ठाकरे यांच्या भाषणात हवा होता, पण तसे न घडल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी अपेक्षाभंग केल्याचे मत काही भाजप नेत्यांनी व्यक्त केले. संदीप देशपांडे यांनी याच मुद्द्यावर बोलताना उद्धव ठाकरे यांना खोचक शब्दात टोला लगावला. मुख्यमंत्र्यांकडून काही अपेक्षा नसल्याने कालच्या मुख्यमंत्र्याच्या भाषणाने अपेक्षाभंग झाला नाही. आपला मुख्यमंत्री, आपले नशीब, आपले दुर्दैव, आपली जबाबदारी, असे म्हणत संदीप देशपांडेंनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला आहे.


तत्पूर्वी मुख्यमंत्र्यांच्या संबोधनावर भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनीही टीका केली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे भाषण हे नेहमीप्रमाणे निराश करणारे होते. मुख्यमंत्र्यांनी जनतेच्या नाराजीची दखल न घेता जनतेवरच नाराजी व्यक्त केली. वीजबिलाबाबतचा प्रश्न चर्चेत असताना त्यावर काहीही दिलासा देण्यात आलेला नाही. शेतकऱ्यांना काही मदत नाही. तसेच, राज्यातील समस्यांवर काही उपाय नाहीत. मुख्यमंत्र्यांच्या भाषणात ना ठोस कृती ना उपाय, असे ट्विट करत त्यांनी संबोधनावर टीका केली होती.