अतुल भातखळकर यांची उद्धव ठाकरेंच्या संबोधनावर जहरी टीका


मुंबई – रविवारी रात्री ८ वाजता सोशल मीडियाच्या माध्यमातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी लाईव्ह संवाद साधला. कोरोनाच्या सध्याच्या स्थितीबाबत आणि अनलॉकबाबत यावेळी बोलताना जनतेला त्यांनी अधिक सावध राहण्याचा संदेश दिला. कोरोनासोबतच राज्यातील इतरही महत्त्वाच्या विषयांवरही या संबोधनात मुख्यमंत्री भाष्य करतील अशी अपेक्षा जनतेला होती, पण मुख्यमंत्री ठाकरे यांनी या विषयांवर बोलणे टाळल्यामुळे त्यांच्या रविवारच्या फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून केलेल्या संबोधनावर अनेकांकडून टीका करण्यात येत आहे. त्यातच उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कार्यपद्धतीवर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनीही टीका केली आहे.


उद्धव ठाकरे यांनी रविवारच्या संबोधनातून महाराष्ट्रात कोरोनाचा धोका वाढणे टाळायचे असेल तर राज्यातील जनतेने शासनाने सांगितलेल्या उपाययोजनांचे काटेकोर पालन करणे गरजेचे असून असे न केल्यास राज्य धोक्याच्या वळणावर असेल, अशा आशयाचा संदेश दिला. अतुल भातखळकर यांनी या वाक्याचा संदर्भ घेत ठाकरे यांच्या टीका केली. ज्या राज्याचा मुख्यमंत्री कायम घरी बसलेला असतो, ते राज्य सतत धोक्याच्या वळणावर असते, असा टोला त्यांनी ट्विटच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना लगावला. तसेच, त्यांनी ‘#वाफा@8pm” असे रविवारी रात्री ८ वाजता झालेल्या संबोधनाच्या लाईव्हचे वर्णन केले.


मुख्यमंत्री प्रत्येक लाईव्हमध्ये महाराष्ट्राच्या जनतेला काळजी घ्यायला सांगतायत. मुख्यमंत्र्यांचे बरोबर आहे. ते घरी बसलेत, निर्णय घेत नाहीत, अर्थपूर्ण बदल्या आणि बढत्या सोडून प्रशासन ठप्प झाले आहे. त्यामुळे जनतेला काळजी घेणे भागच आहे. बाळबोध गप्पा मारताना एक महत्वाचा, लोकोपयोगी, ऐतिहासिक, हुकमी मुद्दा सांगायचे मुख्यमंत्री विसरलेले दिसतायत… तो मुद्दा म्हणजे ‘कोमट पाणी’… जन हो, कोरोनाचा धोका वाढलाय. मुख्यमंत्र्यांसारखे कायमस्वरूपी होम quarantine व्हा”, अशा शब्दात त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या कार्यप्रणालीवर सडकून टीका केली.