कार्तिकी एकादशीच्या पार्श्वभूमीवर बंद राहणार जगतगुरु संत तुकोबांचे देहूतील मंदिर


पुणे – महाराष्ट्रातील प्रार्थनास्थळे आठ महिन्यानंतर दिवाळी पाडव्याच्या सुरु करण्यात आली. याचदरम्यान देहूतील संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांचे मंदिर देखील खुले करण्यात आले आहे. पण सध्या कोरोनाबाधिताच्या संख्येत वाढ होत असल्यामुळे पंढरपूरमध्ये होणाऱ्या कार्तिकी एकादशी यात्रेच्या पार्श्वभूमीवर तीन दिवस तुकाराम महाराजांचे मंदिर बंद ठेवण्याच्या निर्णय देहू संस्थानने घेतला आहे. देहूमध्ये भाविकांनी गर्दी करू नये, असे आवाहन संस्थानाकडून करण्यात आले आहे. कार्तिकी एकादशीच्या काळात पंढरपूरमध्ये संचारबंदी लागू केली जाणार आहे.

महाराष्ट्रातील प्रार्थनास्थळे मार्च महिन्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. पण महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांचा आकडा ऑक्टोबरनंतर काही प्रमाणात कमी झाल्यानंतर प्रार्थनास्थळे सुरू करण्याची मागणी सुरू झाली. मंदिर सुरू करण्याच्या भूमिकेवर विरोधकदेखील आग्रही होते. मंदिर खुली करावीत, अशी भाविकांची देखील मागणी होती. ठाकरे सरकारने मागणीचा विचार करत प्रार्थनास्थळे खुली करण्याचा निर्णय घेतला.

महाराष्ट्रातील मुख्य मंदिरांसह इतर मंदिरे खुली झाली असून नुकतीच प्रार्थनास्थळे खुली झालेली असताना कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कोरोनाचे रुग्ण पुणे जिल्ह्यातही वाढत असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत असल्यामुळे तीन दिवसांवर येऊन ठेपलेल्या कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपूरमध्ये वारकरी आणि भाविकांची गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेता २५ ते २७ नोव्हेबर दरम्यान देहू येथील जगतगुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती देहू संस्थानाचे विश्वस्त संजय मोरे यांनी दिली आहे. या दरम्यान, मंदिरातील नित्य कार्यक्रम महापूजा, कीर्तन इत्यादी संस्थानंच्या वतीने होणार आहेत.