आज रात्री राज्यातील जनतेशी संवाद साधणार मुख्यमंत्री; करु शकतात मोठी घोषणा


मुंबई : देशासह राज्यातील कोरोनाबाधितांच्या आकड्यात दिवाळीनंतर वाढ होत चालली आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज रात्री 8 वाजता जनतेशी संवाद साधणार आहे. त्यामुळे लॉकडाउन किंवा वीज बिल सवलतीबद्दल उद्धव ठाकरे यावेळी काय घोषणा करतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

आज रात्री 8 वाजता जनतेशी फेसबुक, युट्यूबवर लाईव्ह व्हिडीओच्या माध्यमातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे संवाद साधणार आहे. ते राज्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन काही महत्त्वाची घोषणा करण्याची शक्यता आहे.

गेल्या काही दिवसांपासून विरोधकांनी वाढीव वीज बिलाच्या मुद्यावरून आक्रमक पवित्रा घेतला आहे. राज्यभरात सोमवारपासून आंदोलनाचा इशारा मनसेनेही दिला आहे. विशेष म्हणजे, ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी वाढीव वीज बिलाच्या दरात सवलत देण्यास नकार दिल्यामुळे राज्यभरात वीज ग्राहकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वीज बिल सवलतीबद्दल काही घोषणा करणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दुसरीकडे राज्यातील शाळा 23 नोव्हेंबरपासून सुरू करण्याचे आदेश दिले आहे. पण, स्थानिक पातळीवर महापालिकांना परिस्थिती पाहून निर्णय घेण्याचे अधिकार दिले आहे. नागपूर, पुण्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्यामुळे शाळा सुरू न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी शाळा सुरू करण्याचा निर्णय मागे घेतात का, हेही पाहणे महत्वाचे ठरणार आहे.