मुंबईकरांचे टेंशन वाढले; चार दिवसांत कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय वाढ


मुंबई – कोरोना या दुष्ट संकटाने दिल्लीकरांना पुन्हा एकदा जेरीस आणल्याचे चित्र दिसत आहे. दररोज पाच ते आठ हजारांच्या दरम्यान कोरोनाबाधित दिल्लीत आढळून येत असतानाच दुसरीकडे देशाची आर्थिक राजधानी मुंबईत कोरोना पुन्हा एकदा डोके वर काढण्याची शक्यता आहे. कारण मागील चार दिवसांतील आकडेवारी पाहता ही भीती अजूनच गडद होताना दिसत आहे. मुंबईत मागील दोन दिवसात एक हजारांपेक्षा जास्त कोरोनाबाधित आढळून आले आहेत.

दिल्लीतील कोरोनाने पुन्हा एकदा उद्रेक झाल्यानंतर मुंबईत परिस्थिती गंभीर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मुंबईसह महाराष्ट्रात दिवाळीनंतर कोरोनाची दुसरी लाट येण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे. मागील काही दिवसांपासून समोर येत असलेल्या कोरोनाबाधितांच्या आकडेवारीमुळे ही भीती गडद होताना दिसत आहे.

मुंबईतील कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय वाढ होताना दिसत आहे. मुंबईत मागील चार दिवसांतच दिवसाला आढळून येणाऱ्या रुग्णांची संख्या ८७१ वरून थेट १ हजार ९२ वर म्हणजे जवळपास ११०० च्या उंबरठ्यावर पोहोचली आहे. मुंबईत १८ नोव्हेबर रोजी ८७१ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. दुसऱ्या दिवशी म्हणजेच १९ नोव्हेबर रोजी यात काहीशी वाढ झाली. रुग्णसंख्या ९२४ रुग्ण आढळून आले. २० नोव्हेबरला रुग्णसंख्या हजारांच्या पलिकडे गेली. मुंबईत १०३१ रुग्ण आढळून आले. तर २१ नोव्हेबर रोजी १०९२ रुग्ण आढळून आले आहेत.

पुढील तीन ते चार आठवडे मुंबईसाठी खूप महत्त्वाचे आहेत. पण कोणत्याही प्रकारचे निर्बंध मुंबईत लागू करण्यात येणार नाही. तीन ते चार आठवड्यानंतर परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतरच निर्णय घेतला जाईल. जलतरण तलाव (स्वीमिंग पूल), शाळा आणि रेल्वे सेवा सुरू करण्यासंदर्भात नियोजन करण्यात आले होते. पण या तिन्ही गोष्टी आता बंद राहतील. इतर ठिकाणावर सध्या कोणताही परिणाम होणार नसल्याची माहिती बृहन्मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी एका मुलाखती दरम्यान दिली होती.