आता एका दिवसात फक्त एवढ्याच भाविकांना मिळणार साईबाबांचे दर्शन


शिर्डी : ठाकरे सरकारने दिवाळीतील पाडव्याच्या मुहूर्तावर राज्यातील सर्व धार्मिकस्थळे सुरु करण्यास परवानगी दिल्यानंतर शिर्डीतील साई मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले. एरवी दररोज शिर्डीत 50 हजार भक्त दर्शन घेत असत, पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरुवातीला मंदिर प्रशासनाच्या वतीने 6 हजार भाविकच दर्शन घेऊ शकणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. परंतु, मंदिर प्रशासनाने सोशल डिस्टंन्सिंगचा बोजवारा उडत असल्यामुळे आता मात्र गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी कंबर कसली आहे.

आता नवे नियम शिर्डीत गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी करण्यात आले आहेत. जास्तीत जास्त आठ हजार भक्तांनाच एका दिवसांत दर्शन देण्यात येणार आहे. तसेच साई संस्थानाकडून भक्तांना पास मिळाल्यानंतरच शिर्डीत येण्याचे आवाहन करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी तिरुपती बालाजी मंदिर संस्थानच्या धर्तीवर केवळ ऑनलाईन पास असणाऱ्या भाविकांनाच दर्शन दिले जाणार असल्याचे मंदिर प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले होते. या संदर्भातील वृत्त एबीपी माझाने दिले आहे.

शिर्डी साई संस्थानाचे सीईओ कान्हूराज बगाटे यांनी गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी घेण्यात आलेल्या निर्णयांसंदर्भात सांगितले की, भाविकांसाठी मंदिर सुरु केल्यानंतर सुरुवातीच्या नियोजनानुसार, केवळ 6 हजार भक्तांना दर्शन दिले जात होते. त्यानंतर भाविकांची दर्शनासाठी वाढलेली गर्दी पाहायला मिळाली. मंदिर संस्थानाने त्यानंतर 8 हजार भाविकांना दर्शन देण्याचा निर्णय घेतला आहे. ते पुढे म्हणाले की, भाविकांची संख्या वाढवल्यानंतर स्वच्छतेची आणि सॅनिटायझेशनचीही काळजी घेण्यात येत आहे. तसेच यावेळी बगाटे यांनी पास मिळाल्यानंतरच शिर्डीत येण्याचे आवाहन केले आहे. तर ज्यांच्याकडे ऑनलाईन दर्शन पास असेल त्यांनाच दर्शन मिळणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.