म्हणून ओवेसींवर अद्याप भारतात कुठेही हल्ला झाला नाही: देवेंद्र फडणवीस


नागपूर: एमआयएम पक्षाचे सर्वेसर्वा असदुद्दीन ओवेसी भारतात हिंदुत्व सहिष्णू आहेत म्हणूनच काहीही बोलू शकतात. त्यांच्यावर हल्ला होत नाही. हिंदुत्वाची सहिष्णुता यामधूनच दिसून येत असल्याचे वक्तव्य विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले.

सध्या नागपूरात पदवीधर मतदारसंघ निवडणुकीचा देवेंद्र फडणवीस प्रचार करत आहेत. यावेळी त्यांनी हे वक्तव्य एका सभेत केले आहे. हिंदुत्व हे कधीच कट्टर असू शकत नाही. हिंदुत्व हे सहिष्णू आहे. हिंदुत्वाने कधीच कुणावर आक्रमण केले नसल्यामुळेच भारतात सर्व धर्माचे लोक सुख आणि समाधानाने नांदत असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

तसेच असदुद्दीन ओवेसी हिंदू बहुसंख्य असणाऱ्या देशात काहीही बोलू शकतात. तरीही ओवेसींवर हल्ला होत नाही. यामध्येच हिंदुत्वाची सहिष्णुता दिसून येते. ओवेसी हैदराबादच्या निवडणुकीसाठी सध्या काहीबाही बोलत आहेत. पण याचा त्यांना फायदा होणार नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.

देवेंद्र फडणवीस बिहार विधानसभा निवडणुकीत प्रभारी म्हणून यश मिळवल्यानंतर आता पदवीधर मतदारसंघाच्या मिशनवर आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर पदवीधर मतदारसंघात सहा ठिकाणी सभा होणार आहेत. भाजपचा नागपूर पदवीधर मतदारसंघ हा बालेकिल्ला आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस याठिकाणी संपूर्ण ताकद पणाला लावताना दिसत आहेत.