हरभजन सिंहचा अजिंक्य रहाणेला बहुमुल्य सल्ला


नवी दिल्ली – स्वत:ची अशी वेगळी फलंदाजीची अजिंक्य रहाणेची शैली आहे आणि विराट कोहलीला त्याने कॉपी करणे चुकीचे ठरेल, असे वक्तव्य भारतीय संघाचा माजी फिरकीपटू हरभजन सिंह याने केले आहे.

आपल्या आक्रमक खेळीसाठी भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली ओळखला जातो. कोहली ऑस्ट्रेलियातील पहिली कसोटी खेळल्यानंतर मायदेशी परतणार आहे. कोहलीची पत्नी अनुष्का शर्मा गरोदर असल्याने तो सुटी घेणार आहे. अजिंक्य रहाणेकडे या काळात उर्वरित कसोटी सामन्यांमध्ये संघाच्या कर्णधारपदाची धुरा दिली जाण्याची शक्यता आहे.

विराटच्या अनुपस्थितीत शांत स्वभावाच्या अजिंक्यच्या नेतृत्त्वामध्ये आक्रमकपणा दिसेल का? असा सवाल उपस्थित केला जात होता. शांत आणि संयमी खेळाडू म्हणून अजिंक्यची ओळख आहे. तो विराटपेक्षा अतिशय वेगळा खेळाडू असल्यामुळे विराटसारखे अजिंक्यने आक्रमक होणे चुकीचे ठरेल. आपल्या खेळात किंवा स्वभावात त्याने कोणताही बदल करू नये, असे मत हरभजनने व्यक्त केले आहे. २०१८ साली ऑस्ट्रेलियामध्ये कोहलीच्या नेतृत्त्वाखालील भारतीय संघाने इतिहास रचला होता. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत २-१ असा विजय प्राप्त करुन पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच मायभूमीत पराभूत केलं होतं.

ऑस्ट्रेलियातील विराटची कामगिरी वाखाणण्याजोगी राहिली असल्यामुळे ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील कसोटी सामन्यांमध्ये विराटची अनुपस्थिती नक्कीच जाणवेल. याशिवाय, त्याच्याजवळ संघाला आक्रमकपणे पुढे घेऊन जाण्याची हातोटी आहे त्याचीही उणीव भासेल, असे हरभजन म्हणाला.