‘लव्ह जिहाद’वरुन भाजपचा केवळ शब्दांचा खेळ – किशोरी पेडणेकर


मुंबई: मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी लव्ह जिहाद हा केवळ भाजपचा अजेंडा असून यावरुन केवळ शब्दांचा खेळ भाजप करत असल्याची टीका केली. लव्ह जिहाद कुठे झाला हे आम्ही दाखवून देऊ. पण मुलगा-मुलीच्या पसंतीचा लग्न हा विषय आहे. पण यावरून भाजप केवळ राजकारण करू पाहत असल्याचे किशोरी पेडणेकर यांनी म्हटले आहे.

शनिवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी किशोरी पेडणेकर यांनी संवाद साधला. त्यांनी यावेळी प्रार्थनास्थळे उघडल्यामुळे कोरोना वाढला, या आपल्या वक्तव्याचा भाजपकडून विपर्यास करण्यात आल्याचे म्हटले. मी केवळ प्रार्थनास्थळे नाही तर बारमध्ये जाण्यानेही कोरोना वाढल्याचे मी म्हटले होते. कोरोनाबाबत लोक गंभीर नाहीत. यावरुन मुंबईतील दोन टक्के लोकांनी राजकारण करण्याचा घाट घातल्याची टीका किशोरी पेडणेकर यांनी केली.

तसेच इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांच्या संयमी नेतृत्त्वामुळेच कोरोनाचा प्रादुर्भाव कमी असल्याचा दावा पेडणेकर यांनी केला. राज्य सरकारने या पार्श्वभूमीवर 15 दिवसांसाठी लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द कराव्यात, अशी मागणीही किशोरी पेडणेकर यांनी केली.

तत्पूर्वी लव्ह जिहादवरून भाजपकडून सुरु असलेल्या राजकारणावर मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी टीका केली होती. कोणी कोणाशी लग्न करायचे, हा वैयक्तिक अधिकारी आहे. आपला देश हा धर्माच्याआधारे नव्हे तर संविधानानुसार चालतो, असे अस्लम शेख यांनी म्हटले.

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी अस्लम शेख यांच्या या वक्तव्यावर आक्षेप घेतला. याकूब मेननच्या फाशीला अस्लम शेख यांनी विरोध केला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही थोड्या दिवसांनी त्यांचीच भाषा बोलू लागतील. पण महाराष्ट्रात आम्ही लव जिहाद होऊ देणार नाही. उत्तर प्रदेश सरकारने लव्ह जिहादवर कायदा आणण्याची संपूर्ण तयारी केली आहे, आम्ही त्यांचे समर्थन करतो. उत्तर प्रदेशसारखा कायदा महाराष्ट्रात लागू करावा यासाठी आम्ही विधानसभेत प्रस्ताव मांडू, असे किरीट सोमय्या यांनी म्हटले. त्यामुळे आगामी काळात महाराष्ट्रातही ‘लव्ह जिहाद’वरून राजकारण तापण्याची शक्यता आहे.