‘… तर योग्य पक्षात जा किंवा स्वतःचा पक्ष काढा’: काँग्रेसमधील दरीत वाढ

नवी दिल्ली: काँग्रेस पक्षाच्या दुरवस्थेकडे बोटे दाखविण्यापेक्षा योग्य वाटेल त्या पक्षात जा किंवा स्वतःचा पक्ष काढा, अशा शब्दात काँग्रेसचे लोकसभेतील नेते अधीर रंजन चौधरी यांनी पक्षातील वरिष्ठ नेत्यांना फटकारले आहे. पक्षाच्या पीछेहाटीबद्दल कपिल सिब्बल यांनी केलेल्या वक्तव्यावर प्रतीक्रिया देताना ते बोलत होते.

बिहार निवडणुकीपूर्वी पक्षातील जुन्या आणि तरुण नेत्यांमधील दुफळीचे दर्शन घडवणारे वाद चव्हाट्यावर आले होते. कपिल सिब्बल, पृथ्वीराज चव्हाण, गुलाम नबी आझाद यांच्यासह काही नेत्यांनी नाराजी व्यक्त करणारे पत्र पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांना दिले होते. त्यानंतर नुकतेच एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सिब्बल यांनी हा विषय पुन्हा ऐरणीवर आणला. पक्षाची पीछेहाट होत असलेली पाहावताही नव्हती आणि पक्षाने मागे वळून पाहण्याची गरज व्यक्त करण्यासाठी कोणतेही पक्षांतर्गत व्यासपीठ उपलब्ध नव्हते. त्यामुळे हा मुद्दा सार्वजनिकरित्या मांडावा लागला, असे सिब्बल यांनी सांगितले.

त्यांच्या या वक्तव्यावर एका खाजगी वृत्तवाहिनीशी बोलताना चौधरी यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यामुळे या मुद्द्याला हवा मिळून काँग्रेसमधील नव्या, जुन्यांचा वाद पुन्हा रंगण्याची चिन्ह आहेत. काँग्रेस हा पक्ष आपल्यासाठी योग्य नसल्याची ‘ज्येष्ठां’ची समजूत झाली असेल तर त्यांनी पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात जावे किंवा स्वतःचा पक्ष काढावा, असे ते म्हणाले. वास्तविक हे सर्व ज्येष्ठ नेते एकेकाळी पक्षाच्या सर्वोच्च नेतृत्वाच्या जवळ होते. पक्षाध्यक्ष सोनिया गांधी किंवा राहुल गांधी यांच्याशी ते अजूनही संपर्क साधून आपली बाजू मांडू शकतात किंवा पक्षांतर्गत कोणत्याही व्यासपीठावर आपले मुद्दे मांडू शकता, असेही ते म्हणाले.

या ज्येष्ठ नेत्यांना पक्षाच्या भवितव्याची एवढी चिंता असती त्यांनी बिहार विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या प्रचारात भाग घेऊन आपली निष्ठा सिद्ध करण्याची संधी साधने आवश्यक होते. मात्र, त्यांच्यापैकी एकही जण या निवडणुकीच्या काळात पक्षाच्या कामात होनाट्यही पातळीवर दिसलेला नाही, असेही चौधरी यांनी सांगितले.