बिहारमध्ये आम्ही जे वचन दिले ते पूर्ण केले, महाराष्ट्रात शिवसेनेला कोणतेच वचन दिले नव्हते


मुंबई – बिहारमध्ये जदयूला आम्ही जे वचन दिले होते ते आम्ही पूर्ण केले, पण महाराष्ट्रात शिवसेनेला आम्ही कधीच वचन दिले नसल्याचे भाजपचे विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी म्हटले आहे. भाजपने आधीच बिहारमध्ये जाहीर केले होते, त्यानुसार मुख्यमंत्री जदयूचे नेते नितीश कुमार हेच होतील. भाजपने दिलेले वचन पाळले, पण भाजपने महाराष्ट्रात शिवसेनेला मुख्यमंत्रीपदाबाबत कोणतेही वचन दिले नव्हते, असे प्रवीण दरेकर यांनी म्हटले आहे. आज नितीश कुमार यांचा शपथविधी बिहारमध्ये पार पडत आहे. त्यांच्यासोबत भाजपकडून दोघांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ दिली जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर प्रवीण दरेकर बोलत होते.

भाजप आणि जदयूने बिहारमध्ये बहुमत मिळवल्यानंतर आज मुख्यमंत्र्यांसह इतर मंत्र्यांच्या शपथविधीचे आयोजन केले आहे. आज मुख्यमंत्रीपदाची नितीश कुमार शपथ घेणार आहेत. तर भाजपकडून दोघांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ दिली जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रवीण दरेकर यांनी हे वक्तव्य केले आहे. भाजपने बिहारमध्ये कमी जागा येऊनही नितीश कुमार यांनाच मुख्यमंत्रिपद दिले आहे. पण तिथे भाजपने दोन उपमुख्यमंत्रिपदे स्वत:कडे घेतली आहेत. त्याबाबत प्रवीण दरेकर म्हणाले, दोन उपमुख्यमंत्री बनवण्याचा निर्णय भाजपने कोणत्याही दहशतीमुळे घेतलेला नाही. बिहार हे मोठे राज्य आहे. त्यामुळे दोन उपमुख्यमंत्री नेमण्यात आले आहेत. त्यातही महिलांचे प्रश्न समजून घेऊन निर्णय घेण्यासाठी महिला उपमुख्यमंत्री देण्यात आल्या आहेत.