धनत्रयोदशीला झाली तब्बल ४० टन सोन्याची विक्री….


मुंबई – ग्राहकांनी यंदा धनत्रयोदशीला मोठया प्रमाणात सोन्याची खरेदी केली. यंदा धनत्रयोदशीला मागच्या वर्षीच्या तुलनेत ३० टक्के जास्त सोन्याची विक्री झाली. यंदाच्या धनत्रयोदशीला ग्राहकांनी २० हजार कोटीपर्यंत सोन्यांची खरेदी केल्याची माहिती माहिती आयबीजेए या ज्वेलर्सच्या संघटनेने दिली. आयबीजेएच्या डेटानुसार, धनत्रयोदशीला यंदा देशभरात ४० टन सोन्याची विक्री झाली. त्याची किंमत जवळपास २० हजार कोटींच्या घरात जाते.

देशभरात मागच्यावर्षी १२ हजार कोटी रुपयाच्या सोन्याची विक्री झाली होती. हाच आकडा यंदा २० हजार कोटींच्या घरात असल्याची माहिती आयबीजेएचे राष्ट्रीय सरचिटणीस सुरेंद्र मेहता यांनी आयएएनएस या वृत्तसंस्थेला दिली. ३० टन सोन्याची विक्री मागच्यावर्षी धनत्रयोदशीला झाली होती. यंदा ४० टन सोन्याची विक्री झाल्याची माहिती सुरेंद्र मेहता यांनी दिली.

३० ते ३५ टक्के विक्री मागच्या वर्षीच्या तुलनेत वाढली. ७० टक्क्याने सोन्याची किंमत वाढल्याचेही त्यांनी सांगितले. लॉकडाऊनमुळे मागच्या आठ महिन्यात ग्राहकांना सोने खरेदी करता आले नव्हते, त्यामुळे यंदा खरेदीत वाढ झाल्याचे मेहता म्हणाले. आता लग्नाचा मोसम सुरु होईल. लोक एवढे महिने थांबले होते. आता धनत्रयोदशीच्या निमित्ताने लोकांनी सोन्या-चांदीची खरेदी केल्याचे मेहता यांनी सांगितले. प्रतितोळा ५६ हजारापर्यंत पोहोचलेल्या सोन्याची किंमत आता थोडी कमी झाली आहे. शुक्रवारी प्रतितोळा १० ग्रॅम सोन्याची किंमत ५० हजारच्या पुढे होती.