शॉक दिल्याशिवाय सोमय्यांची बेताल बडबड थांबणार नाही – गुलाबराव पाटील


जळगाव – राज्याचे पाणी पुरवठा मंत्री आणि शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांना किरीट सोमय्यांनी अन्वय नाईक प्रकरणावरुन शिवसेनेवर केलेल्या आरोपांबाबत जेव्हा प्रतिक्रिया विचारली तेव्हा ते म्हणाले की, भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या डोक्यावर परिणाम झाला असून त्यांची बेताल बडबड शॉक दिल्याशिवाय थांबणार नाही.

किरीट सोमय्या हे सध्या बेताल बडबड करत असून त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. त्यांची ही बडबड शॉक दिल्याशिवाय थांबणार नाही. ठाण्यातील रुग्णालयात जाऊन त्यांनी उपचार घ्यावेत, असे गुलाबराव पाटील यांनी म्हटले आहे. किरीट सोमय्या ठाकरे कुटुंबियांच्या पायाजवळ बसून खासदार झाले, आज तेच सोमय्या ठाकरे कुटुंबावरच टीका करत आहेत. हा माणूस अत्यंत एहसान फरमोश असल्याची टीका गुलाबराव पाटील यांनी जळगावमध्ये टीव्ही ९ मराठीशी बोलताना केली.

ठाकरे सरकार म्हणजे रिअल इस्टेटमध्ये भूखंडाचं श्रीखंड लाटण्यात गुंतलेलं सरकार दिसत आहे. मी याआधी दहिसर जमीन घोटाळ्याचा विषय काढला होता. संजय राऊत ऐकत असतील तर त्यांनी स्पष्ट ऐकावे. जी जमीन २ कोटी ५५ लाखांत अल्पेश अजमेरा बिल्डरने घेतली ती ९०० कोटीत विकत घेण्यासाठी मुंबई महापालिका निघाली आहे. यामधील ३५४ कोटी आधीच दिले असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.