किरीट सोमय्यांच्या आरोपांना अन्वय नाईकांच्या कुटुंबियांनी दिले उत्तर


रायगड – अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना अटक करण्यात आल्यानंतर राज्य सरकारला घेरण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरु आहे. या प्रकरणावरुन भाजप आक्रमक झाली असून ठाकरे आणि अन्वय नाईक कुटुंबात जमिनीचे २१ व्यवहार झाल्याचा दावा किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेत केल्यानंतर एबीपी माझाशी बोलताना यासंबंधी अन्वय नाईक कुटुंबियांनी खुलासा केला आहे. किरीट सोमय्या यांनी उद्धव ठाकरे यांचे अन्वय नाईक कुटुंबियासोबत नेमके काय संबंध आहेत हे जाहीर करण्याची मागणी केली आहे. त्यांनी यावरही भाष्य केले आहे.

अन्वय नाईक यांची मुलगी आज्ञा नाईक यांनी किरीट सोमय्या दावा करत असलेले जमिनीचे व्यवहार झाले असल्याची माहिती दिली आहे. बऱ्याच लोकांकडून मला कळले असून व्हिडीओदेखील पाहिला आहे. पण याच्यात गुपीत असे काहीच नाही. आमच्याकडून त्यांनी जागा विकत घेतली आणि आम्ही ती दिली. जे सातबारे किरीट सोमय्या दाखवत आहेत ती खुली कागदपत्रे असतात. महाभूमीच्या वेबसाईटवर गेलात तरी तुम्हाला ती मिळतील. त्यामुळे ही अशी खुली कागदपत्रे जाहीर केल्याबद्दल मी किरीट सोमय्यांचे आभार मानते, असा टोला आज्ञा नाईक यांनी लगावला आहे.

कोणी जमीन विकत का देऊ शकत नाही? हा योग्य मार्गाने झालेला व्यवहार आहे. किरीट सोमय्यांना यामध्ये आता का समस्या जाणवत आहे. आत्महत्येच्या प्रकरणाशी त्याचा काय संबंध आहे. किरीट सोमय्या नेमके काय दाखवू इच्छित आहेत?, अशी विचारणा आज्ञा नाईक यांनी केली आहे. काही मदत किरीट सोमय्या यांना हवी असेल तर मी स्वत: हजर होईल, तुम्ही कधीही बोलवा, असेही त्यांनी म्हटले आहे.

जर किरीट सोमय्या यांना राजकारण करायचे असेल तर ते काहीही मुद्दे आणू शकतात. पण हे आत्ता आणण्यामागचे प्रयोजन काय आहे हे मलाच विचारायचे आहे? गुन्हेगार अर्णब गोस्वामीला पाठीशी का घालत आहात?, अशी विचारणा आज्ञा नाईक यांनी केली आहे. तर दुसरीकडे ५ मे २०१८ ला जेव्हा आम्ही अग्नि दिला, तेव्हा किरीट सोमय्या कुठे गेले होते? त्यांची बोबडी वळली होती का? अशी विचारणा अन्वय नाईक यांची पत्नी अक्षता नाईक यांनी केली.

किरीट सोमय्या आधी झोपले होते. पण अर्णब गोस्वामीला अटक झाल्यानंतर जागे झाले असल्याची टीका आज्ञा नाईक यांनी केली आहे. कित्येक वस्तू लोक विकत घेतात. या वस्तूंशी हा संबंध नाही. माझ्या घरातील दोन माणसे गेली आहेत. जमिनीच्या व्यवहाराशी किरीट सोमय्यांनी त्याची तुलना करु नये. एक आई आणि तिचा मुलगा गेला आहे. त्याचा राजकारणाशी संबंध जोडू नका. बोबडी वळली आहे, आवाज बंद होण्यास वेळ लागणार नाही, असा इशारा अक्षता नाईक यांनी यावेळी किरीट सोमय्या यांना दिला आहे.