देशातील शेतकऱ्यांसाठी मुकेश अंबानी यांचा महत्त्वपूर्ण निर्णय


मुंबई : देशातील शेतकऱ्यांच्या हितासाठी रिलायन्स कंपनीचे मालक उद्योगपती मुकेश अंबानी यांनी मोठा निर्णय घेतला आहे. मायक्रोसॉफ्ट कंपनीचे मालक बिल गेट्स यांच्या क्लीन एनर्जीच्या बेकथ्रू एनर्जी वेंचर्स लिमिटेड कंपनीत अंबानी यांनी 5 कोटी डॉलर म्हणजे जवळपास 375 कोटी रुपये गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे.

विशेष म्हणजे ब्रेकथ्रू एनर्जी वेंचर्समध्ये अंबानी यांच्याआधी उद्योगपती जेफ बेजोस, मायकल ब्लूमबर्ग, जॅकमा, मासायोशी सोन यासारख्या दिग्गजांनी गुंतवणूक केली आहे. ऊर्जा आणि कृषी तंत्रज्ञानाच्या विकासात बिल गेट्स यांची ग्रीन वेंचर्स कंपनी गुंतवणूक करुन हवामान संकटावर उपाय शोधण्यासाठी काम करते. शेतकऱ्यांना तंत्रज्ञानाची माहिती देणे जेणेकरुन ते आपले उत्पन्न वाढवू शकतील, या प्रकल्पामागील हा मुख्य उद्देश आहे. भारतातील शेतकऱ्यांनाही या प्रकल्पाचा फायदा होईल.

यासंदर्भात रिलायन्स इंडस्ट्रीकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, संपूर्ण देशाला मुकेश अंबानी यांच्या या प्रयोगाचा फायदा होईलच त्याबरोबर गुंतवणुकदारांनाही होईल. गुंतवणुकदारांना या प्रकल्पात चांगले रिटर्न मिळण्याची शक्यता आहे. पण अशाप्रकारच्या गुंतवणुकीसाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून अद्याप मंजुरी देण्यात आलेली नाही. ही गुंतवणूक रिलेटेड पार्टी ट्रान्जेक्शन अंतर्गत होत नाही. त्याचबरोबर रिलायन्स इंडस्टीज लिमिटेडच्या कुठल्याही प्रमोटर, प्रमोटर ग्रुप किंवा ग्रुप कंपनीचे कोणतेही हित नसल्याची माहिती कंपनीकडून देण्यात आली आहे.

मुकेश अंबानी बिल गेट्स यांच्या कंपनीत गुंतवणूक करण्यासाठी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे सब्सिडीयरीचा वाटा विकून पैसा गोळा करत आहे. आतापर्यंत जिओ प्लेटफॉर्म्समधून आरआयएलने 32.96 टक्क्याचा वाटा विकून 1.52 लाख कोटी रुपये जमा केले आहेत. त्याचबरोबर रिलायन्स रिटेल वेंचर्स लिमिटेडमधून 10.09 टक्के सब्सिडीयरीचा वाटा विकून जवळपास 47 हजार कोटी रुपये गोळा करण्यात आले आहेत. या पैशांचा उपयोग कर्ज फेडण्यासाठी किंवा गुंतवणूक करण्यासाठी वापर केला जात आहे.