काँग्रेसचा घणाघात; …म्हणून फडणवीस सरकारने दाबले अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण


मुंबई: भाजपचे खासदार राजीव चंद्रशेखर हे अर्णब गोस्वामी यांच्या रिपब्लिक चॅनेलमध्ये भागीदार होते. भाजपसाठी गोस्वामी हे काम करतात म्हणूनच अन्वय नाईक यांचे आत्महत्या प्रकरण देवेंद्र फडणवीस सरकारने दाबल्याचा घणाघाती आरोप महाराष्ट्र काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे.

‘रिपब्लिक टीव्ही’चे मालक, संपादक अर्णब गोस्वामी यांना अन्वय नाईक आत्महत्या व या प्रकरणात झालेल्या अटकेनंतर राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी व भाजपच्या नेत्यांमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. अन्वय नाईक व ठाकरे कुटुंबांमध्ये जमीन व्यवहार झाल्याची माहिती भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी पुढे आणली आहे. पण हे सगळे व्यवहार खुले असल्याचे नाईक कुटुंबीयांनी म्हटले आहे. सोमय्या हे अर्णब गोस्वामी यांना पाठिशी घालण्यासाठी आरोप करत असल्याचे आज्ञा नाईक यांनी म्हटले आहे. त्यानंतरही या व्यवहारावरून सोमय्या ठाकरे सरकारला लक्ष्य करत आहेत.

सोमय्यांच्या या आरोपांचा सचिन सावंत यांनी समाचार घेतला आहे. अन्वय नाईक यांच्या आत्महत्येचा व जमीन व्यवहाराचा संबंध काय? मराठी कुटुंबाची वाताहत झाली त्याचे सोमय्या यांना काहीही पडले नाही. किरीट सोमय्या यांनी नाईक यांच्या आत्महत्येसाठी जबाबदार असलेल्या व्यक्तीला पाठीशी घालण्याच्या प्रयत्नात त्यांच्या जमीन व्यवहारालामध्ये आणून आपली व भाजपची हीन मानसिकता दर्शवल्याची टीका सावंत यांनी केली आहे.

सावंत यांनी भाजप आणि अर्णब गोस्वामी यांच्या संबंधांबाबतही गौप्यस्फोट केला आहे. भाजपचे खासदार राजीव चंद्रशेखर हे रिपब्लिक चॅनेलमध्ये भागीदार होते. भाजपशी गोस्वामी यांचा थेट संबंध आहे. आत्महत्या प्रकरण फडणवीस सरकारने दाबले कारण भाजपशी संबंधित आरोपी आहे. भाजपसाठी काम करतो. भाजप हा पक्ष महाराष्ट्र द्वेष्टा असल्याचेही सावंत यांनी म्हटले आहे.