केंद्र सरकारची महाराष्ट्रासह नैसर्गिक आपत्तीग्रस्त ६ राज्यांना मदत जाहीर


नवी दिल्ली : चक्रीवादळ, पूर आणि भूस्खलनांमुळे प्रभावित झालेल्या देशातील राज्यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समितीने निधी मंजूर केला आहे. पश्चिम बंगाल, ओडिशा, महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेश आणि सिक्किम या राज्यांचा यामध्ये समावेश आहे. एकूण 4,381.88 कोटींचा निधी या राज्यांना देण्यात आला आहे. यावर्षी चक्रीवादळ, पूर आणि भूस्खलनामुळे अनेक राज्यांमध्ये मोठे नुकसान झाले होते.

राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधी, एनडीआरएफ अंतर्गत 6 राज्यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वात उच्चस्तरीय आयोगाने (एचएलसी) अतिरिक्त केंद्रीय सहाय्य मंजूर केले आहे. देशातील 6 राज्यांना या मंजुरीनंतर 4,381.88 कोटी रुपये दिले जातील. चक्रीवादळाच्या वादळामुळे पश्चिम बंगालला 2,707.77 कोटी तर ओडिशाला 128.23 कोटी रुपये देण्यात आले आहेत. त्याचबरोबर निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीसाठी महाराष्ट्राला 268.59 कोटी रुपयांची मदत देण्यात येणार आहे.

577.84 कोटी रुपये कर्नाटकमध्ये पूर आणि दरड कोसळून झालेल्या नुकसानीसाठी, 611.61 कोटी रुपये मध्य प्रदेशला आणि 87.84 कोटी रुपये सिक्कीमला दिले जातील. 22 मे 2020 रोजी पश्चिम बंगाल आणि ओडिशा या बाधित राज्यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दौरा केला. अनफानच्या चक्रीवादळाच्या दुर्घटनेनंतर पश्चिम बंगालला 1000 कोटी आणि ओडिशाला 500 कोटी रुपयांची आर्थिक मदत जाहीर केल्यानंतर ही आर्थिक मदत 23 मे रोजी देण्यात आली.

या व्यतिरिक्त मृतांच्या नातेवाईकांना 2 लाख रुपयांची मदत आणि जखमींना 50 हजार रुपयांची भरपाई पंतप्रधानांनी जाहीर केली होती. या आपत्तींनंतर लगेचच सर्व राज्यांत केंद्र सरकारच्या वतीने आंतर-मंत्रालयीन केंद्रीय पथके तयार केली गेली. या व्यतिरिक्त, सन 2020-21 या आर्थिक वर्षात आजपर्यंत केंद्र सरकारने एसडीआरएफकडून 28 राज्यांना 15,524.43 कोटी रुपये दिले आहेत.