किरीट सोमय्यांचा आणखी एक धक्कादायक आरोप; उद्धव ठाकरेंनी शपथविधीनंतर बिल्डरला दिले ३४५ कोटी


मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि कुटुंबियांवर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा गंभीर आरोप केले आहेत. शपथविधीच्या दुसऱ्याच दिवशी उद्धव ठाकरेंनी ३४५ कोटी बिल्डरला गिफ्ट दिल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत केला आहे.

यावेळी तीन घोटाळ्यांची माहिती देत त्याविरोधात कायदेशीर कारवाई सुरु कऱण्यात आल्याचेही किरीट सोमय्या यांनी सांगितले. संजय राऊत किंवा शिवसेनेच्या कोणत्याही नेत्यामध्ये याच्यासंबंधी हिंमत असेल तर बोलावे, असे आव्हानही यावेळी त्यांनी दिले. ठाकरे सरकारला एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर आणखी तीन घोटाळ्यांची कायदेशीर कारवाई २८ नोव्हेंबरला सुरु करणार आहे. मुंबई उच्च न्यायालयात यासंबंधी दोन जनहित याचिका आणि एक लोकायुक्तांकडे दाखल होणार असल्याची माहिती यावेळी किरीट सोमय्या यांनी दिली.

ठाकरे सरकार म्हणजे रिअल इस्टेटमध्ये भूखंडाचं श्रीखंड करण्यात गुंतलेलं सरकार दिसत आहे. याआधी दहिसर जमीन घोटाळ्याचा विषय मी काढला होता. संजय राऊत ऐकत असतील तर त्यांनी स्पष्ट ऐकावे. 2 कोटी ५५ लाखांत अल्पेश अजमेरा बिल्डरने जी जमीन घेतली, मुंबई महापालिका ती जमीन ९०० कोटीत विकत घेण्यासाठी निघाली आहे. यामधील ३५४ कोटी आधीच दिले असल्याचे आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.

२८ नोव्हेंबरला उद्धव ठाकरेंचा शपथविधी झाल्यानंतर अल्पेश अजमेला बिल्डरला दुसऱ्याच दिवशी ३४५ कोटी गिफ्ट म्हणून देण्यात आले. मुळ प्रश्न मी नाही तर उद्दव ठाकरे आणि संजय राऊत वळवत आहेत. त्यांचे अन्वय नाईक कुटुंबासोबत संबंध होते आणि आहेत. सातबारा खोटे आहेत, असे उत्तर द्या ना, असे म्हटले आहे.

संजय राऊत तुमची महापालिका अल्पेश अजमेराकडून २ कोटी ५५ लाखांची जमीन ९०० कोटीत घेते. जे मूळ मुद्दे आहेत ते टाळू नका, असे प्रत्युत्तर किरीट सोमय्या यांनी दिले आहे. उद्धव ठाकरेंना मी फक्त पाच प्रश्न विचारले आहेत त्यातील एका तरी उत्तर द्या. महाराष्ट्राच्या जनतेला माहिती हवी आहे. शिवसेनेत हिंमत नाही म्हणून विषय वळवत असल्याची टीका संजय राऊत यांनी केली आहे.

आणखी नऊ सातबारा उतारे मी सादर करत आहेत. परवा एक सातबारा दिला तर लोक मला येऊन माहिती देतात, अधिकारी देत नाहीत. अन्वय नाईक कुटुंबासोबत रश्मी ठाकरे यांनी ३० जमिनीचे व्यवहार केले आहेत. आणखी माहिती हवी असेल तर देतो. एकंदर मान्यवर ठाकरे परिवाराचे ४० जमीन व्यवहार झाले आहेत त्यापैकी ३० अन्वय नाईक कुटुंबासोबत असल्याचा दावा किरीट सोमय्या यांनी केला आहे.

उद्धव ठाकरेंमध्ये हिंमत असेल तर त्यांनी उत्तर द्यावे. अन्वय नाईक कुटुंबासोबत ४० पैकी ३० जमीन व्यवहार का आहेत याचे उत्तर उद्धव ठाकरे, ऱश्मी ठाकरेंच्या प्रतिनिधीने द्यावे. आर्थिक व्यवहार करत आहेत याशिवाय मी काही आरोप केलेले नाहीत. मी फक्त खुलासा मागितला आहे. यांची उत्तर देण्याची हिंमत नाही. उद्धव ठाकरेंनी किशोरी पेडणेकर यांच्याबद्दल पुरावे देऊनही कारवाई केली नाही. संजय राऊत यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी पोलीस ठाण्यात जाऊन कारवाई करावी. मी दिलेली कागदपत्रे चुकीची असतील तर जेलमध्ये टाका. पण उद्धव ठाकरेंमध्ये हिंमत नाही. शिवसेनेत हिंमत असेल तर किरीट सोमय्याला हात लावून दाखवा, असे जाहीर आव्हान किरीट सोमय्या यांनी दिले आहे.

माझ्या प्रश्नांची उत्तरे देता येत नाहीत म्हणून शिव्या द्यायला निघाले आहेत, हीच तुमची संस्कृती आहे. म्हाडाची जमीन अनिल परब यांनी खाल्ली. म्हाडाने नोटीस दिली आहे. संजय राऊत यांच्यात हिंमत असेल तर किरीट सोमय्यावर कारवाई करावी, असेही ते म्हणाले आहेत. ठाकरे सरकार घोटाळेबाज सरकार आहे. हिंमत असेल तर ठाकरे सरकारच्या कोणत्याही प्रवक्त्याने किरीट सोमय्याशी बोलावे. ही भाषा, हे संस्कार त्यांचे आहेत. त्यांच्या भाषेत, संस्कारात मला पडायचे नसल्याचे किरीट सोमय्या यांनी संजय राऊत यांच्या टीकेवर बोलताना म्हटले आहे.