तेजस्वी यादव यांच्यासह कमलनाथ यांचीही उमा भारती यांनी केली स्तुती


नवी दिल्ली – बिहार विधानसभा निवडणुका आणि मध्यप्रदेशात पार पडलेल्या पोटनिवडणुकांवर भाजपाच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी केंद्रीय मंत्री उमा भारती यांनी आपली प्रतिक्रिया दिली. उमा भारती यांनी बिहारमध्ये महाआघाडीचे नेतृत्व करणाऱ्या तेजस्वी यांदव यांची स्तृती करत ते एक चांगले व्यक्ती असल्याचे म्हटले आहे. त्याचबरोबर ते बिहारला योग्य प्रकारे चालवू शकतात. पण त्याला काही वेळ लागेल. राज्य चालवण्याचा कोणताही अनुभव त्यांच्याकडे नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे. उमा भारती यांनी याव्यतिरिक्त मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांचीदेखील स्तुती केली आहे.

उमा भारती यांनी बुधवारी भोपाळमध्ये माध्यमांशी संवाद साधला. त्यांनी निवडणुकांच्या निकालांवर यावेळी भाष्य केले. तेजस्वी यादव हे एक चांगले व्यक्ती आहेत. परंतु राज्य चालवण्यास सध्या ते सक्षम नाहीत. पुन्हा एकदा बिहारला राजदचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांनी जंगलराजमध्ये ढकलले असते. तेजस्वी यादव हे नेतृत्व करू शकतात. पण त्यासाठी काही काळ जावा लागेल, असेही उमा भारती म्हणाल्या.

मध्यप्रदेशमधील निवडणूक कमलनाथ यांनी चांगल्याप्रकारे लढली. पण जर आपले सरकार त्यांनी योग्यरितीने चालवले असते तर या ठिकाणी आज एवढ्या समस्या निर्माण झाल्या नसत्या. ते एक चांगले व्यक्ती आहेत आणि माझ्या मोठ्या भावाप्रमाणे आहेत. ही निवडणूक त्यांनी खुप हुशारीने लढल्याचेही त्या म्हणाल्या.