तेजस्वी यादव यांची बिहारमध्ये महागठबंधनची सत्ता आणण्याची तयारी


पाटणा : विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतरही बिहारमधील राजकीय घडामोडींमध्ये वेगाने उलथापालथ होऊ लागली आहे. आपल्या सर्व आमदारांना पुढील एक महिना पाटण्यातच थांबण्याची विनंती राष्ट्रीय जनता दलाचे नेते आणि महागठबंधनचे प्रमुख नेते तेजस्वी यादव यांनी केली आहे. महागठबंनचीच सत्ता बिहारमध्ये येणार, असल्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे.

आज (12 नोव्हेंबर) महागठबंधनच्या नेत्यांची बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांच्या निवासस्थानी बैठक झाली. तेजस्वी यादव यांनी या बैठकीत आमदारांना संबोधित केले. बिहारमध्ये भाजपप्रणित एनडीएला स्पष्ट बहुमत मिळाले असल्यामुळे बिहारमध्ये एनडीए पुन्हा सत्ता स्थापन करण्याच्या तयारीत आहे. पण एनडीएतील घटकपक्षांमध्ये खातेवाटपावरुन बिनसले तर त्याचा लगेच फायदा घ्यायचा, अशी तेजस्वी यादव यांची रणनिती असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

दुसरीकडे भाजपसोबत हातमिळवणी करण्याच्या तयारीत काँग्रेसचे काही आमदार असल्याचा संशय तेजस्वी यांना असल्यामुळे त्यांनी सर्व आमदारांना पाटण्यातच थांबवण्याचे आवाहन केल्याची माहिती माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, तेजस्वी यादव यांनी आज बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालावर प्रतिक्रिया दिली. परिणाम आणि निर्णय या दोन गोष्टींमध्ये फरक असतो. त्यांच्या बाजूने निवडणुकीचे परिणाम तर आपल्या बाजूने निर्णय असल्याचे तेजस्वी यादव आमदारांना म्हणाले.

बिहारच्या जनतेचे मी नम्रपणे हात जोडून आभार मानतो. महागठबंधनच्या बाजूने जनतेचा निर्णय आहे. जवळपास 130 जागा आम्हाला मिळाल्या आहेत. पण फसवणूक करुन नितीश कुमार यांनी सरकार बनवल्याची टीका तेजस्वी यादव यांनी बैठकीनंतर केली.