बिहारनंतर आता पश्चिम बंगालमध्येही निवडणूक लढवणार एमआयएम


नवी दिल्ली – बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालात भाजपप्रणित एनडीएने बाजी मारली असली तरी यावेळी निकालात बरेच बदल पाहायला मिळाले. यावेळीच्या निवडणुकीत असदुद्दीन ओवेसी यांच्या एमआयएम या पक्षाने मुसंडी मारत पाच जागांवर विजय मिळवला. दरम्यान, एनडीटीव्ही इंडियाला दिलेल्या विशेष मुलाखतीत बिहार निवडणुका आणि अन्य मुद्द्यांवर असदुद्दीन ओवेसी यांनी भाष्य केले. बिहारची जनता कोणाची गुलाम नाही, त्याचबरोबर आता पश्चिम बंगालमध्येही निवडणुका लढवण्याचा विचार केला जाईल, अशी प्रतिक्रिया दिली.

आम्ही बिहारमध्ये पाच वर्षांपूर्वी सहा जागांवर निवडणूक लढवली होती आणि त्यापैकी पाच जागी आमचे डिपॉझिट जप्त झाले होते. आमचा त्या सहाही जागांवर पराभव झाला होता. तरी देखील आम्ही खुप परिश्रम घेतले आणि सीमांचलच्या जनतेच्या प्रश्नांवर लक्ष दिले. आम्हाला जनतेने मतदान केले, प्रेम दिले. पुढे अजूनही आम्हाला मेहनत करायची असल्याचे आहे, ओवेसी म्हणाले. आता पश्चिम बंगालमधील आमच्या पक्षाच्या काही लोकांशी आम्ही चर्चा करणार आहोत. खोट्या आरोपाखाली टीएमसीने आमच्या अनेक नेत्यांना तुरूंगात टाकले आहे. आम्ही उत्तर प्रदेशच्या निवडणुका लढवल्या आहेत आणि यापुढेही लढवू. पश्चिम बंगालचा निर्णय अद्याप बाकी आहे. आम्ही पक्षाच्या लोकांशी निर्णयापूर्वी चर्चा करू, असेही त्यांनी स्पष्ट केले.

आम्ही यापूर्वी बिहारमध्ये राजदच्या लोकांशी बोलणी केली होती. त्यादृष्टीने आम्ही प्रयत्न देखील केले होते. पण त्यांनी काही मान्य केले नाही. बिहारचा मतदार हा कोणाचा गुलाम नाही. आम्हाला ज्यांनी मतदान केले, त्यांचे आभार. जो पक्ष मतदार आमचा गुलाम आहे आणि आम्ही त्याचा हवा तसा वापर करू असे समजतो ते दिवस आता गेले आहेत. तुम्हाला काम करावे लागेल आणि लोकांची मनेही जिंकावी लागतील, असे ओवेसी म्हणाले.

भाजपची बी टीम असे आम्हाला म्हटले जाते त्यावर आमचा आक्षेप आहे. बी टीम आम्हाला बनवा, असे मी सांगतो. आमच्यावर जेवढे तुम्ही आरोप कराल तेवढाच आमचा आत्मविश्वास वाढेल. आमच्या पक्षाला लोकांनी साथ दिली आहे. मी जेव्हा १३ वर्षांचा होतो, तेव्हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची लोक आमच्या घरावर ओवेसी कब्रिस्तान या पाकिस्तान असे म्हणून पळून जायचे. यापूर्वीपासून आम्ही हे ऐकत आलो आहोत. चांगले काम आम्ही करत असल्यामुळेच आमच्यावर खोटे आरोप केले जात असल्याचे ओवेसी म्हणाले.