आत्मनिर्भर भारत ३.०; ‘या’ योजनेला केंद्र सरकारकडून मार्चपर्यंत मुदतवाढ


नवी दिल्ली : ‘ईसीएलजीएस’ म्हणजेच आपत्कालीन पत हमी योजनेला केंद्र सरकारने ३१ मार्च २०२१ पर्यंत मुदत वाढ देण्यात आल्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केली आहे. केले. आत्मनिर्भर भारत ३.० च्या तिसऱ्या टप्प्यातील महत्वाच्या आज त्यांनी पत्रकार परिषद घेऊन घोषणा केल्या. उद्योजकांची आर्थिक चिंता मिटवणारी आजची घोषणा असून त्यांना बँकाकडून पुढील पाच महिने तातडीने पत पुरवठा होणार आहे.

३० नोव्हेंबरपर्यंत याआधी या योजनेला एक महिन्याची मुदतवाढ देण्यात आली होती. कोरोना नंतरच्या स्थितीमध्ये आता अर्थव्यवस्था गती घेत आहे. त्याचबरोबर सण-उत्सवांचे दिवस आहेत, कर्जदारांना अशावेळी पत हमी मिळाली तर लाभदायक ठरणार आहे, सरकारने याचा विचार करून या योजनेला मुदतवाढ दिली आहे.

आत्मनिर्भर भारत पॅकेजचा एक भाग म्हणून ‘ईसीएलजीएस’ची (ECLGS) घोषणा उद्योजकांना पूर्णपणे तारणमुक्त पत हमी मिळावी यासाठी करण्यात आली आहे. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग, व्यावसायिक उपक्रम, यासाठी वैयक्तिक कर्जरूपाने आणि मुद्रा योजनेतून दि. २९ फेब्रुवारी २०२० रोजी ५० कोटी रूपयांपर्यंत असलेल्या कर्जाच्या २० टक्के मर्यादेपर्यंत पतपुरवठा करण्यात येणार आहे. तसेच २५० कोटी ज्या उद्योगांची वार्षिक उलाढाल आहे, त्यांनाही या योजनाचा लाभ घेता येणार आहे.

बँका आणि वित्तीय संस्थांनी या योजनेनुसार ९.२५ टक्के आणि एनबीएफसींनी १४ टक्के व्याजमर्यादा निश्चित केली आहे. चार वर्षांसाठी या योजनेअंतर्गत कर्जपुरवठा करण्यात येणार आहे. तसेच त्यामध्ये मुद्दलाच्या परतफेडीसाठी एक वर्षाचा कालावधी देण्यात आला आहे.

कर्ज घेणाऱ्या उद्योगांची माहिती आणि इतर आकडेवारी ‘ईसीएलजीएस’ पोर्टलवर देण्यात आली आहे. त्यानुसार आत्तापर्यंत ६०.६७ लाख व्यवसायिकांनी कर्ज घेतले असून त्यांना २.०३ लाख कोटी रूपये मंजूर करण्यात आले आहेत. तसेच आत्तापर्यंत १.४८ लाख कोटी रूपये वितरित करण्यात आले आहेत.