प्रकाश आंबेडकरांचा भाजपवर गंभीर आरोप; बिहारमध्ये दंगली घडवण्याचा होता प्रयत्न


औरंगाबाद: वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी भाजपचा बिहार विधानसभा निवडणुकीदरम्यान दंगली घडवण्याचा डाव असल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. त्यांनी हा आरोप औरंगाबादेतील पत्रकार परिषदेत बोलताना केला आहे. बिहारमध्ये एनडीएचा विजय झाला असला, तरी तो आम्हाला मान्य नसल्याचे प्रकाश आंबेडकर म्हणाले. त्याचबरोबर आंबेडकर यांनी ईव्हीएमच्या मुद्द्यावरुनही निवडणूक आयोगावर जोरदार टीका केली आहे.

बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपप्रणित एनडीएला काटावर बहुमत मिळाले आहे. बिहारच्या मैदानात नितीश कुमार यांचा जदयू, भाजप आणि मित्रपक्षांच्या युतीने 125 जागा जिंकत बाजी मारली आहे. असे असले तरी हा एनडीएचा विजय आपण मानत नसल्याचे वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. त्याचबरोबर भाजपचा बिहार विधानसभा निवडणुकीदरम्यान फायदा करुन घेण्यासाठी बिहारमध्ये दंगली घडवण्याचा डाव होता. पण आम्ही भाजपचा हा डाव पूर्णत्वास जाऊ दिला नसल्याचा गंभीर आरोपही आंबेडकर यांनी केला आहे.

आपण बिहारमध्ये पप्पू यादव यांच्यासाठी सभा घेतल्या. १० हजारापर्यंत श्रोते सभेला उपस्थित असायचे. पप्पू यादव यांनी कोरोना काळात खूप मदत केल्याचे स्थानिकांनी सांगितले. मग अशावेळी ती व्यक्ती 4 नंबरला कशी काय फेकली जाऊ शकते? असा प्रश्न उपस्थित करत ईव्हीएम मशीन आणि निवडणूक आयोगाच्या विश्वासार्हतेवर प्रकाश आंबेडकर यांनी पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

निवडणूक आयोग पेपर छापणे आणि ते केंद्रापर्यंत पोहोचवणे एवढेच काम करत असल्याची टीकाही प्रकाश आंबेडकर यांनी केली. रिटर्निंग ऑफिसरच्या हातात ईव्हीएम मशीन असतात. त्या रिटर्निंग ऑफिसरकडून स्पष्टीकरण मागावे, अशी विनंती आपण न्यायालयाकडे करत असल्याचेही आंबेडकर म्हणाले. जोपर्यंत रिटर्निंग ऑफिसर स्पष्टीकरण देत नाही, तोपर्यंत आरोप आणि संशय काम राहील, असेही आंबेडकर म्हणाले.