बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपप्रणित एनडीएला स्पष्ट बहुमत


पाटणा- भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीने अर्थात एनडीएने बिहार विधानसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळवत सत्ता कायम राखली आहे. आज पहाटेपर्यंत बिहार विधानसभा निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया सुरु होती. सर्व २४३ जागांचे निकाल हाती असून त्यात १२५ जागा एनडीएने मिळवल्या आहेत. या १२५ जागांमध्ये भाजपने ७४ जागा, ४३ जागा जदयूने तर मित्र पक्षांनी ८ जागांवर विजय मिळवला आहे.

दुसरीकडे काँग्रेसप्रणित महाआघाडीने ११० जागांवर विजय मिळवला आहे. यामध्ये सर्वात चांगली कामगिरी लालूप्रसाद यादव यांच्या राजदने केली आहे. ७५ जागांवर विजय मिळवत तेजस्वी यादव यांचा राजद हा बिहारमधील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. महाआघाडीतील काँग्रेसला १९ जागांवर तर डाव्यांना १६ जागांवर विजय मिळवत आला. त्याचबरोबर एमआयएमला पाच जागा, तर बसपा, लोजपा आणि अपक्ष यांना प्रत्येकी एका जागेवर विजय मिळाला आहे. बिहार विधानसभा निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले असून एनडीएला बहुमत मिळाले आहे आणि नितीश कुमार हेच बिहारचे मुख्यमंत्री होतील हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.

मंगळवारचा संपूर्ण दिवस बिहारमध्ये एनडीए आणि महाआघाडी यांच्यातील चुरस पाहण्याचा होता. कारण जसे कल सुरुवातीला हाती येऊ लागले तेव्हा महाआघाडी जिंकत असल्याचे दिसू लागले होते. पण हे चित्र त्यानंतर बदलले. एनडीएकडे झुकते माप जाऊ लागले. दरम्यान बहुमताकडे एनडीए जाईल असे वाटत असतानाच पुन्हा एकदा महाआघाडीही त्यांच्या बरोबर स्पर्धा करताना दिसली. एनडीए आणि महाआघाडी यांच्यात रात्रीपर्यंत फारसा फरक नव्हता. त्यामुळे बिहार विधानसभा त्रिशंकू होईल, असेही अंदाज काही राजकीय विश्लेषकांनी वर्तवले. पण तसे काहीही न घडता एनडीएला १२५ जागा मिळाल्या आहेत आणि बिहारमध्ये पुन्हा एकदा नितीशकुमारच मुख्यमंत्री होतील, हे आता स्पष्ट झाले आहे.

बिहार विधानसभेत सत्ता स्थापन करण्यासाठी १२२ जागांची मॅजिक फिगर आवश्यक होती. अशात १२५ जागांवर विजय मिळवत एनडीएने आपली सत्ता राखली आहे. दरम्यान महाआघाडीने काल रात्री उशिरा मतमोजणीच्या निकालांमध्ये नितीश कुमार ढवळाढवळ करत असल्याचा आरोप केला. निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांच्या राजद आणि काँग्रेस नेत्यांचे एक शिष्टमंडळ हे भेटीला गेले होते. आमच्या अनेक उमेदवारांना विजयी घोषित करण्यात आले आणि प्रमाणपत्र घ्यायला जेव्हा ते उमेदवार गेले, तेव्हा त्यांना वाट बघायला सांगून नंतर पराभव झाल्याचे सांगण्यात आल्याचा आरोपही महाआघाडीने केला. दरम्यान हे आरोप निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी फेटाळले आहेत. तसेच मतमोजणी करताना आमच्यावर कोणताही दबाव नसल्याचेही या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.