फडणवीसांना जाते बिहार निवडणुकीतील यश आणि विजयाचे श्रेय – प्रसाद लाड


मुंबई – अवघ्या काही तासातच बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल स्पष्ट होणार असून देशाचे लक्ष राज्यातील मजमोजणीकडे लागून राहिले आहे. लवकरच एनडीए की महागठबंधंन यांच्यात कोण बाजी मारणार हे स्पष्ट होईल. पण, मतमोजणीत भाजपाप्रणित एनडीएने विजयी आघाडी घेतल्यामुळे निवडणुकीत कोण बाजी मारणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. भाजपचे उपाध्यक्ष प्रसाद लाड यांनी बिहार विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होण्यापूर्वीच यश आणि विजयाचे श्रेय विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे.

भाजपने बिहार विधानसभा निवडणुकांसाठी प्रभारी म्हणून राज्याचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना संधी दिली होती. बिहार निवडणुकांसाठी फडणवीस यांनी रणनिती आखत प्रचारही केला. पण, फडणवीस यांना निवडणुकांच्या अंतिम टप्प्यात कोरोनाची बाधा झाल्याने ते मुंबईत परतले होते. त्यांनी मुंबईतील सेंट जॉर्ज रुग्णालयात उपचार घेऊन कोरोनावर मात केली. दरम्यानच्या काळात निवडणूक प्रचाराची सांगता झाली. पण, आपली जबाबदारी फडणवीस यांनी पूर्णपणे निभावली होती. हे यश फडणवीस यांच्या रणनितीचे आणि नेतृत्वाचे असल्याचे भाजप नेते आणि माजी आमदार प्रसाद लाड यांनी म्हटले आहे.

भाजप आणि एनडीएचा बिहार विधानसभा निवडणुकीत धुव्वा उडणार असल्याचे चित्र एक्झिट पोलमध्ये दाखवले, मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्याविरोधात वातावरण असल्याचे दाखवले. पण भाजप आणि पंतप्रधान मोदींवर बिहारमधील जनतेने विश्वास दाखवल्याची प्रतिक्रिया प्रसाद लाड यांनी एका मराठी वृत्त वहिनीला दिली आहे. बिहार निवडणुकीची जबाबदारी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी उचलली. राष्ट्रीय पातळीवर नेतृत्व केल्यामुळे हे यश आणि विजय देवेंद्र फडणवीस यांचाही आहे. एनडीए या निवडणुकीत 130 च्यावर जाईल आणि महागठबंधन 100 च्या खाली येईल, असा विश्वासही यावेळी प्रसाद लाड यांनी व्यक्त केला.